![]()
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या परसोडा येथील संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहात ४० एकर जागेवर भव्यदिव्य कीर्तन मंडप व्यवस्था, दर्शन मंडप, पंगतीची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली होती. या सोहळ्यासाठी ५० हजार भाविकांनी उपस्थिती लागली होती. आज परसोडा येथे वारकऱ्यांची पांढरी अवतरली होती. विराट जनसागर जमला होता. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या अखंड हरिनाम सप्ताहची सांगता मोठ्या उत्साहात बहिणाबाई संस्थानचे प्रमुख मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी मधुसूदन महाराज यांनी “विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता॥” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाची मधुसूदन महाराजानी काल्याच्या कीर्तनासाठी निवड केली. महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या, गोपी, गोपाळ यांच्या लीला सांगितल्या. विश्वाचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि सर्वांचा स्वामी असलेला श्रीकृष्ण यशोदामातेला “आई” म्हणून हाक मारतो. देव सर्वशक्तिमान असूनही भक्ताच्या प्रेमापुढे स्वतःला लहान करून घेतो. देव भक्तांच्या प्रेमाने जणू बाधला जातो. काला म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन कृष्णाच्या लीलांचे स्मरण करणे आणि त्यातून भक्ती, प्रेम, एकता आणि समर्पण यांचा संदेश मिळतो. परमात्मा निष्काम आहे. त्याला स्वतःसाठी काहीही नको. परंतु वृंदावनातील गोपींच्या निरपेक्ष प्रेमाने श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमात रमतो. गोपींची भक्ती ही स्वार्थासाठी नव्हती. त्यांना श्रीकृष्णाच्या प्रेमाशिवाय दुसरी अपेक्षा नव्हती. म्हणून निष्काम भक्ती हीच खरी भक्ती आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की, निर्गुण परमात्मा भक्ताच्या प्रेमासाठी सगुण रूप धारण करतो. पुढे महाराज आपल्या कीर्तनात सांगतात की, देव भक्तीने मिळतो, अहंकाराने नाही, देव प्रेमाने बांधला जातो, संपत्तीने नाही. यशोदेचे वात्सल्य, गोपींचे निष्काम प्रेम आणि भक्तांचा निर्मळ भाव यामुळे परमात्मा स्वतः भक्तांच्या जवळ येतो.”असा उपदेश महाराजांनी आपल्या कीर्तनातून केला. परसोडा येथील संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.. छाया : बाबासाहेब वाघ
Source link
परसोडा येथे वारकऱ्यांची अवतरली पंढरी; पन्नास हजारांवर भाविक:मधुसूदन महाराज मोगल यांचे काल्याचे कीर्तन उत्साहात