![]()
सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व श्री शिवाजी विद्यालय, शहर शाखेच्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्त भारत अभियान’अंतर्गत संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाला आत्मनिर्भर बनवायचे असेल तर देशाचा युवक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असला पाहिजे. त्यासाठी तो व्यसनमुक्त असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे पुणे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता पाकिरे यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सर्वोदयी श्रीकृष्ण विखे पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक बबनराव कानकिरड, प्रा. दत्तात्रय भाकरे, मुख्याध्यापक मनोज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. “आभाळाची आम्ही लेकरे- काळी माती आई’ हे गीत खड्या आवाजात सादर करून दत्ता पाकिरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंकज देशमुख यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी “आम्ही कधीही व्यसन करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही’, अशी सामूहिक शपथ घेतली. याप्रसंगी शालेय परिसरात लावण्यात आलेले व्यसनमुक्ती जनजागृती पोस्टर प्रदर्शन आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त व्यसनमुक्तीची राखी बनवून अभियानात सहभाग घेतला. “हमारा संकल्प – नशामुक्त भारत’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला अनुराधा मराठे, पी. वाय. देशमुख, प्रेमेंद्र जंजाळे, निलेश देशमुख, प्रतिभा कराळे, व्ही. बी. वाकोडे, वैशाली नेमाडे, वर्षा जाधव, शीतल मोरे यांच्यासह शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. नवनिर्माणासाठी राज्यभर अभियान “व्यसन हे केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबीयांचा नाश करते. दारू, तंबाखू, गुटखा, अंमली पदार्थांचे सेवन, आजचे मोबाइलचे व्यसन तरुण पिढीला आतून पोखरत आहे, असे नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक बबनराव कानकिरड म्हणाले. या संकटाचा सामना करण्यासाठी “व्यसनमुक्त भारत – समृद्ध भारत’ नवनिर्माणासाठी हे अभियान राज्यात सर्वत्र राबवत असल्याची माहिती कानकिरड यांनी दिली.
Source link
आत्मनिर्भर भारतसाठी युवक सृदृृढ हवा:शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्त भारत अभियान; दत्ता पाकिरे यांचे प्रतिपादन