Headlines

शेतीविषयक तंटे आता महसूल लोक अदालतीतून सुटणार:प्रलंबित दावे तडजोडीने मिटवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन




राज्य सरकारच्या महसूल विभागाने १ सप्टेंबर ते ३१ मार्च २०२७ या काळात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील महसूल न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले जमिनीशी संबंधित दावे आपापसांतील सहमतीने कायमस्वरूपी निकाली काढले जातील. या अभियानाचा लाभ घेऊन प्रलंबित महसुली दावे तडजोडीने मिटवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे पक्षकारांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ही समस्या दूर करण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे अभियान जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर राबवले जात आहे. प्रलंबित दाव्यांमधील दोन्ही पक्षकार तडजोड योजनेअंतर्गत अर्ज सादर करू शकतात. प्राप्त अर्जांनुसार महसूल लोक अदालतीचे आयोजन केले जाईल. दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणांवर अंतिम निर्णय घेऊन ते कायमस्वरूपी निकाली काढले जातील. जिल्ह्यातील संबंधित पक्षकारांनी आपापल्या क्षेत्रातील प्रलंबित दाव्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. नागरिकांनी संबंधित कार्यालयांशी त्वरित संपर्क साधून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *