![]()
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना सकारात्मक दिशा मिळावी, या उद्देशाने सेवा फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा ४ युवा’ या विशेष उपक्रमाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला जागृत भारत विश्व अभियानाचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद महाराज, प्रसिद्ध कवी व गझलकार अनंत राऊत, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर, संस्थेचे संस्थापक वैभव वानखडे, मातोश्री मीराताई वानखडे आणि ‘सेवा ४ युवा’चे राज्यप्रमुख आशिष वानखडे उपस्थित होते. महाराष्ट्र गीत व कागदावर समस्या लिहून त्यांचे दहन करण्याच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित, आत्मविश्वास जागवणारे गीत आणि त्यावर नृत्य सादर करण्यात आले. मयूर देव्हाडे यांनी उपस्थितांना सकारात्मकतेची शपथ दिली. या सोहळ्यात संयोजक विकास जाधव व संदीप काळे यांचा सत्कार करण्यात आला. दिनेश धनजे यांच्या ‘संदेशे आते है…’ या देशभक्तीपर गीताने उपस्थितांची मने जिंकली. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर यांनी स्वतःच्या अनुभवातून आवड आणि करिअर यामधील संतुलनावर संवाद साधला. कवी अनंत राऊत यांनी कविता आणि किस्स्यांच्या माध्यमातून रंगत आणली, तर स्वामी श्रीकंठानंद महाराज यांनी क्षमता, निवड, आत्मविश्वास आणि अध्यात्माची सांगड घालत यशस्वी जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह जया भारती यांनी केले, तर आभार फाउंडेशनचे उपाध्यक्ष अॅड. गौरव काटेकर यांनी मानले. या वेळी पूनम वानखडे, भाग्यश्री भेराने, अपेक्षा चौधरी (जळगाव), तृप्ती काटेकर (बुलडाणा) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अॅड. अनुराधा पवार, अमोल नव्हते, गिरीश आखरे, पूनम कीर्तने आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थापक वैभव वानखडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, “सेवा फाउंडेशन’च्या “सेवा हॅपिनेस’ उपक्रमातून राज्यातील ४५० जिल्हा परिषद शाळांमधील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, अभ्यास दौरे, नवोदय शिष्यवृत्ती आणि क्रीडा-सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ दिला जात आहे. याच उपक्रमाचा विस्तार करत आता महाविद्यालयीन तरुणांना सुजाण, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनवण्यासाठी ‘सेवा ४ युवा’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Source link
सेवा फाउंडेशनचा ‘सेवा 4 युवा'तून विद्यार्थ्यांच्या विकासाचा संकल्प:विविध प्रशिक्षण, उपक्रमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस