![]()
पनीरमध्ये शुद्ध दुग्धजन्य स्निग्धांशांऐवजी स्वस्त वनस्पतीजन्य स्निग्धांश मिसळून बोगस पनीर ग्राहकांना खाऊ घातले जात असल्याचे समोर आले आहे. या भेसळीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वाळूज येथील हॉटेल मनी प्लांटचा परवाना निलंबित केला आहे.
.
सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी येथील मे. हॉटेल मनी प्लांटची तपासणी केली. यात हॉटेलमधून पनीरचे नमुने घेण्यात आले. त्यानुसार वनस्पतीजन्य चरबीची गंभीर भेसळ असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे अन्न विश्लेषकांनी हे पनीर ग्राहकांसाठी असुरक्षित असल्याचे घोषित केल्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या गंभीर त्रुटींबाबत प्रशासनाने हॉटेलचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, विहित मुदतीत हॉटेलचालकाने कोणतेही लेखी स्पष्टीकरण सादर केला नसल्याने सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांनी हॉटेलचा परवाना निलंबित केला आहे.
प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालानंतर कारवाई
मध्यंतरी एफडीएच्या कार्यपद्धतीवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. उच्च न्यायालयाच्या या पवित्र्यानंतर आता एफडीएने कारवाईच्या पद्धतीत बदल केला आहे. जोपर्यंत प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल हाती येत नाही तोपर्यंत हॉटेलवर थेट सील ठोकण्याची कारवाई केली जात नाही. यामुळे आनंदाचे वातावरण आहे.