![]()
अमरावती शहर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असले तरी, शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे या उत्साहावर पाणी फिरले आहे. महापालिकेच्या रस्ते देखभाल विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे रोजच्या प्रवासासोबतच गणेशोत्सवाच्या काळात नागरिक, वाहनधारक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील राजकमल चौकाचे जोड रस्ते, इर्विन चौक, गाडगे नगर, राजापेठ, बडनेरा रोड आणि कॅम्प परिसरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचते, त्यामुळे वाहनधारकांना खड्डे दिसत नाहीत आणि रोजच लहान-मोठे अपघात घडत आहेत. गणेशोत्सवामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच खड्ड्यांमुळे वाहतूक हळू होते आणि शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. रात्रीच्या वेळी किंवा पावसात खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी या रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचे दावे महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, प्रत्यक्षात मोजक्याच रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाच्या लक्षात होते. तेथेही केवळ माती, गिट्टी आणि मुरुम टाकून वरवरची दुरुस्ती करण्यात आली, जी पहिल्याच पावसात वाहून गेली. रस्त्यांची त्वरित दुरुस्ती न झाल्यास आणि गणेशोत्सवादरम्यान खड्ड्यांमुळे कोणताही अपघात झाल्यास त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक नागरिक व विविध संघटनांनी दिला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. “आम्ही दरवर्षी नियमित कर भरतो, तरीही आम्हाला अशा खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणात तरी प्रशासनाने रस्ते सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाने वेळेत पाऊल न उचलल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील काही संस्था, संघटनांनी दिला आहे.
Source link
अमरावतीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवली अडचण:राजकमल चौक, इर्विनसह अनेक रस्त्यांवर खड्डे; नागरिक व गणेशभक्तांना त्रास