![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, गेल्या 18 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. येत्या 19 सप्टेंबरपासून ते मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी रीतसर परवानगी नाकारली असली, तरीही त्यांनी आपला निर्णय कायम ठेवत मुंबईकडे कूच केली आहे. या सर्व घडामोडींवर अजय बारस्कर यांनी आपली परखड प्रतिक्रिया देत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनोज जरांगे यांचे हे उपोषण खरोखरच मराठा आरक्षणासाठी आहे, की केवळ चौघांचे दाखले मिळवून देण्यासाठी आणि चौकशा थांबवण्यासाठी? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाने त्यांना हे उपोषण करायला लावलेले नाही. त्यामुळे जरांगे यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास त्याला दहीहंडे, पारवे, पांडुरंग तारक आणि गंगाधर काळकुटे हेच लोक सर्वस्वी जबाबदार असतील, असा थेट आरोप करत या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बारस्कर यांनी केली आहे. अजय बारस्कर म्हणाले, मनोज जरांगे यांचे उपोषण खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी असेल, तर त्यांच्या स्वतःच्या सहीचे मागण्यांचे सविस्तर निवेदन कुठे आहे? त्या निवेदनात नेमक्या कोणत्या मागण्या आहेत आणि त्या सरकारकडे अधिकृतपणे कधी सादर करण्यात आल्या, हे समाजासमोर जाहीर करावे, अशी मागणी अजय बारस्कर यांनी केली आहे. तसेच सरकारने आतापर्यंत कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणते निर्णय घेतले आणि कोणती कार्यवाही प्रलंबित आहे, याची कागदोपत्री माहिती जरांगे समाजासमोर का मांडत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलन केवळ चार व्यक्तींना प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी तसेच ईडी व इतर यंत्रणांकडून सुरू असलेल्या कथित चौकशा थांबवण्यासाठी दबावतंत्र म्हणून केले जात आहे का? याचे स्पष्ट उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी बारस्कर यांनी केली आहे. आरक्षणाच्या नावावर त्यांनी मोठा पैसा कमावला पुढे बोलताना अजय बारस्कर म्हणाले, मनोज जरांगे यांच्याजवळ असणाऱ्या टोळीला विविध नोटीस आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या नावावर त्यांनी मोठा पैसा कमावला आहे. या लोकांच्या गळ्यावर फास लागले आहेत. त्यांनी अवैध पैसा कमावला आहे. त्यांची ईडी चौकशी लागली आहे. ती चौकशी थांबवावी, असा दाबायल जरांगे पाटलांवर ताकत असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. तसेच जरांगेंच्या जीवाला धोका झाला तर कोण जबाबदार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा तसेच केवळ चार प्रमाणपत्रांसाठी अथवा कोणत्याही चौकशा थांबवण्यासाठी मनोज जरांगे यांच्यावर उपोषणाचा दबाव टाकून त्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित व्यक्तींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पुरावे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध मनोज जरांगे यांचा जीव धोक्यात घालणे, उपोषणासाठी प्रवृत्त करणे आणि दबाव निर्माण करणे या आरोपांखाली कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजय बारस्कर यांनी केली आहे.
Source link
मनोज जरांगेंचे उपोषण नेमके कोणासाठी?:अजय बारस्कर यांचा सवाल; आरक्षणाच्या नावाखाली मोठा पैसा कामावल्याचा केला आरोप