![]()
नारंगवाडी परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले असून, पिकांची वाढ खुंटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी श्री जयराम विद्यालय, नारंगवाडी येथे पर्जन्यसूक्ताचे सामूहिक पठण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अजय पवार यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत पर्जन्यसूक्ताचे पठण करून पर्जन्यराजाला साकडे घातले. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये तसेच परिसरात वेळेवर समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. सध्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीनसह विविध पिकांची लागवड केली आहे. मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांसाठी पावसाची नितांत गरज असताना पाऊस लांबत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या या सामूहिक पठणातून शेतकरी आणि निसर्गाशी असलेले नातेही अधोरेखित झाले. पर्जन्यसूक्ताच्या सामूहिक पठणावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शांततेत व एकाग्रतेने पठणात सहभाग घेतला. परिसरात लवकरच चांगला पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे मुख्याध्यापक अजय पवार यांनी सांगितले की, पाऊस हा शेती आणि संपूर्ण जीवनव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्जन्यसूक्ताच्या पठाणसोबत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पाण्याची बचत याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
Source link
पिकांना जीवदान मिळण्यासाठी पर्जन्यराजाला साकडे:नारंगवाडीत जयराम विद्यालयातील उपक्रम; खरीपाला पावसाची प्रतीक्षा