![]()
क्षयरोग (टीबी) हा जरी गंभीर आजार असला तरी तो पूर्णपणे उपचारक्षम असून, वेळेवर अचूक निदान, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित औषधोपचार आणि उपचारांचा पूर्ण कोर्स घेतल्यास या आजारापासून निश्चितपणे मुक्तता मिळू शकते, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा रुग्णालयातील समन्वयक साधना बच्छाव यांनी केले. त्यामुळे समाजातील टीबीबाबतची अनाठायी भीती आणि गैरसमज दूर करून रुग्णांना मानसिक व सामाजिक सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छात्र सेना (एनसीसी) विभागाच्या वतीने क्षयरोगमुक्त अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील होते. यावेळी सटाणा ग्रामीण रुग्णालयाचे पंकज जाधव, छात्र सेना प्रमुख लेप्टनंट तुषार खैरनार, उपप्राचार्या डॉ. सुनिता शेवाळे, डॉ. राजेंद्र वसाईत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्राचार्य अनिल पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी क्षयरोगाबाबत समाजात पसरलेले विविध गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग जनजागृतीवर आधारित विविध बोलक्या पोस्टर्सचे प्रभावी सादरीकरण केले. या जनजागृती कार्यक्रमाला महाविद्यालयातील ९० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Source link
योग्य निदानाने क्षयरोगापासून मुक्तता:जनजागृती अभियान, सटाण्यामध्ये साधना बच्छाव यांचे प्रतिपादन