राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीची राज्य सरकारने सर्वोच्च दखल घेतली असून, केंद्राच्या आर्थिक मदतीची अजिबात वाट न पाहता राज्य शासन आपल्या स्वतःच्य
.
आठवड्याभरात प्राथमिक आढावा; 5 ऑक्टोबरनंतर अधिकृत पंचनामे
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत आणि अनेक भागांत उतारा अत्यंत कमी येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सखोल चर्चा झाली असून, सर्व मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांत जाऊन प्राथमिक पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढच्या आठवड्याभरात सरकारकडे दुष्काळाचा प्राथमिक आढावा अहवाल प्राप्त होईल. एनडीआरएफच्या (NDRF) नियमांनुसार केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी ५ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष पंचनामे करावे लागतात. त्या नियमांचे पालन करून केंद्राला रीतसर प्रस्ताव पाठवला जाईल आणि केंद्रीय पथकही पाहणीसाठी येईल. मात्र, तोपर्यंत हात जोडून न बसता राज्य सरकार आपल्या स्वतःच्या संसाधनांतून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवेल, असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त वीज आणि पाण्याचे काटेकोर नियोजन
वाढत्या दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक आघाड्यांवर निर्णय घेतले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींना थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्यांची पिके जळून जाऊ नयेत म्हणून संध्याकाळच्या वेळी अतिरिक्त वीज देण्याची विशेष तजवीज करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे सिंगल फेजिंगवर वीज बंद ठेवली जात होती, ती देखील तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना जास्तीचा वीजपुरवठा केला जात आहे.
यंदा ‘अल निनो’चे सावट असणार याची पूर्वकल्पना असल्याने शासनाने आधीच मोठ्या प्रमाणावर वैरण विकास कार्यक्रम राबवून चाऱ्याची लागवड करून ठेवली आहे. त्यामुळे चाराटंचाई निर्माण होऊ दिली जाणार नाही. मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील छोट्या धरणांमध्ये पाण्याची प्रचंड तूट आहे. भविष्यातील तीव्र टंचाई लक्षात घेता धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्जमाफीच्या उर्वरित याद्या वेगाने पूर्ण करण्याचे आदेश
शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार हलका करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, शासनाची कर्जमाफी योजना वेगाने सुरू असून आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून संकटाच्या काळात शेतकऱ्यांना नवा आर्थिक आधार मिळू शकेल.
विरोधी पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारणाची वाईट सवय; थेट दुष्काळ घोषणेच्या मागणीवर टोला
विरोधकांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी परखड प्रत्युत्तर दिले. दुष्काळाचे शासकीय नियम आणि जीआर हे काही आजचे नाहीत, ते विरोधकांच्या कार्यकाळातही तेच होते. एनडीआरएफकडून राज्याला हक्काचा निधी मिळवायचा असेल, तर त्या कायदेशीर प्रक्रियेचे तंतोतंत पालन करावेच लागते. “जेव्हा आपला अन्नदाता शेतकरी संकटात असतो, तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्याला मदत करणे गरजेचे आहे. मात्र विरोधकांना प्रत्येक संकटात निव्वळ राजकारण करण्याची वाईट सवय लागली आहे,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

नांदेडमधील बैठकीतील काजू-बदामावर नाराजी; प्रशासनाला संवेदनशीलतेची समज
नांदेड येथील दुष्काळ आढावा बैठकीत मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या ताटात काजू-बदाम ठेवल्याच्या व्हायरल प्रकारावर विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाच्या ढिसाळपणावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शासकीय बैठकांमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवण्याची प्रशासनाची एक पारंपरिक पद्धत असते, पण अशा गंभीर विषयांच्या बैठकीत या गोष्टी नक्कीच टाळल्या पाहिजेत. कोणी मुद्दाम दुष्काळात असे केले असे म्हणणे चुकीचे ठरेल, तरीही अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संवेदनशीलता बाळगलीच पाहिजे.”
नागपूरला एलिव्हेटेड रस्त्याची मोठी भेट
दरम्यान, नागपूरच्या विकासावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘एलिव्हेटेड रोड’चे (उड्डाणपूल) लोकार्पण नागपूरकरांसाठी मोठी भेट असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे शहरातील प्रचंड वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फुटणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला झालेल्या अटकेवरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसवाल करत, “काँग्रेस उमेदवाराला कोणत्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे आणि राहुल गांधी अशा गुन्ह्यांचे समर्थन करतात का, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे,” असा पलटवार केला. —————–
हेही वाचा…
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामावर ताव! : नांदेडमधील आढावा बैठकीतील प्रकाराने सरकारवर टीकेची झोड

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली खरीप पिके डोळ्यांदेखत करपून गेली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. शेतकरी सरकारकडून तत्काळ दुष्काळ जाहीर होण्याची आणि आर्थिक मदतीची चातकासारखी वाट पाहत असतानाच, नांदेडमध्ये राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचे संतापजनक आणि चीड आणणारे दर्शन घडले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत चक्क मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारत दुष्काळाची चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी