नांदेड येथील विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत सुकामेव्यावर ताव मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून राज्यभरातून टीकेची झोड उठत असतानाच, यावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव चांग
.
नेमके काय घडले होते?
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री, खासदार व आमदारांसमोर काजू-बदामाच्या प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या. खासदार संजय जाधव हे बदाम खात असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. बैठकीत उपस्थित राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर टेबलावरून या प्लेट्स तातडीने हटवण्यात आल्या होत्या.

पत्रकारांच्या प्रश्नावर खासदार संजय जाधव यांचा पारा चढला
व्हायरल व्हिडिओवरून प्रसारमाध्यमांनी जाब विचारला असता खासदार संजय जाधव यांनी भडकून उत्तरे दिली. “मी काय माणूस नाही का? लहान मुलांसारखे काय प्रश्न विचारता? माझ्यावर टीका होतेय तर होऊ द्या, मी ती स्वीकारायला तयार आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. समोर ठेवले होते आणि कोणाला भूक लागली म्हणून खाल्ले, तर त्यात एवढा मोठा काय गुन्हा झाला? दुष्काळ आहे म्हणून कोणी काही खाणारच नाही का?”
पुढाऱ्यांना का विचारता, जिल्हाधिकाऱ्यांना विचारा
“हा विषय प्रशासनाचा आहे. पुढारी किंवा मंत्र्यांनी तिथे काजू-बदाम आणून ठेवण्याची मागणी केली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना विचारा की तुम्ही हे का ठेवले? 50-100 रुपयांच्या ड्रायफ्रूट्सवरून एवढा राईचा पर्वत करण्याची काही गरज आहे का? दुष्काळात शेतकरी त्रस्त आहे, त्या मुख्य विषयावर चर्चा करा. काजू-बदाम खाण्यासारख्या निष्फळ विषयांवर चर्चा करणे हा मीडियाने चालवलेला फालतू धंदा आहे. ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे तिकडे करा,” असा उलट सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.
बैठकीतील असंवेदनशीलतेवरून आधीच उमटलेत तीव्र पडसाद
या बैठकीवरून आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत, “प्रशासनाने अशा गंभीर विषयांच्या बैठकीत अशा गोष्टी टाळायला हव्यात आणि संवेदनशीलता दाखवायला हवी,” असे म्हटले होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी “अधिकाऱ्यांना डोकं नाही का? अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने आम्ही मंत्री बदनाम होतो,” असा संताप व्यक्त केला होता.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, “शेतकरी आत्महत्या करत असताना दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम चघळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे,” असा आरोप केला होता.
एककीकडे मराठवाड्यात महिना-दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने पिके करपून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे, तर दुसरीकडे आढावा बैठकीतील सुकामेवा आणि त्यावर लोकप्रतिनिधींनी दिलेली ही आक्रमक प्रतिक्रिया यामुळे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.
————————-
हेही वाचा…
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामावर ताव! : नांदेडमधील आढावा बैठकीतील प्रकाराने सरकारवर टीकेची झोड

महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली खरीप पिके डोळ्यांदेखत करपून गेली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. शेतकरी सरकारकडून तत्काळ दुष्काळ जाहीर होण्याची आणि आर्थिक मदतीची चातकासारखी वाट पाहत असतानाच, नांदेडमध्ये राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचे संतापजनक आणि चीड आणणारे दर्शन घडले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत चक्क मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारत दुष्काळाची चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
नांदेड बैठकीतील काजू-बदामावर फडणवीसांची नाराजी: केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; दुष्काळावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर दुष्काळी परिस्थितीची राज्य सरकारने सर्वोच्च दखल घेतली असून, केंद्राच्या आर्थिक मदतीची अजिबात वाट न पाहता राज्य शासन आपल्या स्वतःच्या तिजोरीतून बळीराजाला तातडीने आर्थिक व इतर सर्वतोपरी मदत देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजना, कर्जमाफी, पाणी-चाऱ्याचे नियोजन आणि विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवर सरकारची भूमिका अत्यंत सविस्तरपणे मांडली. येथे वाचा संपूर्ण बातमी