![]()
सुमारे ८ ते १० हजार लोकसंख्या असलेले बार्शिटाकळी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून महानची ओळख आहे. १५ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत असलेल्या गावात विकासाचे दावे फोल ठरताना दिसत आहेत. पिंजर मार्गावरील मुख्य कमानीपासून ते घाणी चौक या ५०० मीटर अंतराच्या र
.
कमानीपासून ते घाणी चौक, घाणी चौकातून मुख्य गावात प्रवेश करण्यासाठी सध्या साधा, मातीमिश्रित, तुटपुंजा रस्ता अस्तित्वात आहे. या मार्गाचा इतिहास पाहिला तर सुमारे ३० वर्षांपूर्वी भाजपचे मूर्तिजापूरचे तत्कालीन आमदार दिवंगत भाऊसाहेब लहाने यांनी स्थानिक विकास निधीतून या ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करून दिले होते. त्यानंतर २००५-०६ दरम्यान मूर्तिजापूरचे तत्कालीन आमदार दिवंगत तुकाराम बिरकड यांनी या मार्गाचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले होते. तसेच गावातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले होते. गावात २० ते २५ हातपंप बसवून दिले होते. मात्र, २००६ नंतर आजतागायत म्हणजेच तब्बल २० वर्षांत या रस्त्याकडे कोणत्याही संबंधित शासकीय विभागाने अथवा लोकप्रतिनिधीने ढुंकूनही पाहिलेले नाही. सध्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी मोठे खड्डे आहेत. खोल नाल्या तयार झाल्या आहेत. २० वर्षांपूर्वी तयार झालेला हा डांबरी रस्ता आज पूर्णपणे उखडला आहे. यावरून साधी दुचाकी चालवणेही कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे २० वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या मार्गाचे डांबरीकरण करावे. रुंदीकरण करावे. नाल्यावर उंच पूल बांधावा, अशी मागणी जोर धरत आहे.
तात्पुरत्या मलमपट्टीवर ग्रामस्थांचा संताप दरवर्षी गणेशोत्सव व दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अपघात घडू नये म्हणून ग्रामपंचायतीकडून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये मुरूम व विटांचे तुकडे टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, मिरवणुका संपताच अवघ्या काही दिवसांत हे खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ होतात. यापूर्वी दिवंगत आमदार भाऊसाहेब लहाने, तुकाराम बिरकड यांनी निधी देऊन रस्ता केला होता. आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा मूर्तिजापूरचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या ५०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण व पुलाच्या कामास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रस्तावावर कारवाई नाही ^महान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये डीपीडीसी व अल्पसंख्याक मंत्र्यांकडे कमानी ते घाणी चौक रस्ता आणि नाल्यावरील पुलाच्या उंचीकरणासाठी रितसर प्रस्ताव व निवेदन सादर केले आहे. मात्र, अद्याप या निवेदनावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. – सुनील ढाकोलकार, सरपंच, ग्रामपंचायत महान.