मुंबई महानगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी, महापौरांच्या बंगल्याचा खर्च, मोकळ्या मैदानांचा व्यावसायिक वापर आणि देशातील राजकीय परिस्थिती यावरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “मुंबईकरांच्या पैशांची होणारी उधळपट्
.
महापौर बंगल्यावरील खर्च आणि स्थगिती
नव्या महापौरांसाठी महानगरपालिकेतर्फे केल्या जात असलेल्या खर्चावर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, “महापौर होऊन सहा महिनेही झाले नाहीत, तोच लाल दिव्याची गाडी आणि इटालियन मार्बलवरून वाद सुरू झाला. आता परत अडीच कोटी रुपये मागितले, जणू काय ताजमहालच बांधायचा होता. पण मुंबईकरांनी आणि मीडियाने आवाज उठवल्यामुळे महानगरपालिकेने या अडीच कोटींच्या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. आम्ही या स्थगितीचे स्वागत करतो.”
मोकळी मैदाने ढापण्याचा घाट
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या व्यावसायिक वापरावरून भाजपवर गंभीर आरोप केले. नेव्हिल डिसुजा फुटबॉल टर्फ (वांद्रे) हे मुंबईतील एकमेव पूर्ण आकाराचे आर्टिफिशियल टर्फ आहे, जिथे हजारो मुले-मुली फुटबॉलचे प्रशिक्षण घेतात. ही जागा ढापून तिथे एका आवडत्या कंत्राटदाराला कन्व्हेन्शन सेंटर बांधायला दिले जाणार असून, त्याला भाजपच्या एका नेत्याचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
अंधेरीतील 16 एकर मोकळी जागा आणि म्हाडाचे दोन प्लॉट एकाच ट्रस्टला फुकट दिल्याचे त्यांनी उघड केले. “कोविड काळातही आम्ही तिथे मदत केली होती. तिथे एक चांगले क्रिकेटचे मैदान आणि मियावाकी जंगल होते. पण आता त्या ट्रस्टने तिथे ‘Trespassers will be prosecuted’ असे फलक लावले आहेत. जसे ब्रिटिशांच्या काळात ‘Indians Not Allowed’ असायचे, तसे आता ‘Mumbai-kar Not Allowed’ असे फलक लागणार का?” असा सवाल त्यांनी संतप्तपणे विचारला.
मोकळ्या मैदानांसाठी लवकरच मोठे आंदोलन
मुंबईच्या मैदानांचे लिलाव होऊ देणार नाही, असा इशारा देत आदित्य ठाकरे यांनी मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली. “भाजप आता मुंबईचे आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान आणि शिवाजी पार्कही विकायला मागेपुढे पाहणार नाही. या 16 एकर जागेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मी सर्व मुंबईकरांना, राजकीय पक्षांना आणि सोसायट्यांना आवाहन करतो की, राजकीय मतभेद विसरून मुंबईच्या हक्काच्या मोकळ्या मैदानांसाठी एकत्र या.”
हे सरकार युवकांच्या विरोधात आहे
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) ‘जेन झी’ संवादावर विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले. “तरुणांशी संवाद साधून काहीही फायदा नाही. सरकार आणि भाजपच युवा विरोधी आहे. तरुणांवर लाठीचार्ज केला जातो, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या जातात आणि त्यांना ‘दहशतवादी’ ठरवले जाते. अशा स्थितीत त्यांच्या कानात दिलेले कानमंत्र उपयोगी पडणार नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील दबावावर चिंता
‘मेटा’च्या अधिकाऱ्यांची आणि केंद्रीय मंत्र्यांची सुरू असलेली भेट तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या दडपशाहीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “जर एक्स किंवा मेटासारख्या फ्री स्पीच प्लॅटफॉर्मला सरकारकडून बोलावून दबाव टाकला जात असेल, तर ही देशातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोक्याची घंटा आहे. विकसित देशांमध्ये कायद्याचे पालन असणे गरजेचे असते, जर तिथे फ्रीडम ऑफ स्पीचच नसेल तर देश विकसित होऊ शकत नाही.”
हेही वाचा…
उद्धव ठाकरेच बरे म्हणायची वेळ येईल! कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक, शिंदे-फडणवीस आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेत अत्यंत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ‘मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट’ रचल्याचा थेट आरोप केला आहे. पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी