सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांची चोरी काही नवीन नाही. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांचा दावा आहे की, 1989 मध्ये गाव -गावांतून शहर – शहरांतून आणि देश – विदेशातून पूजित होऊन अयोध्येत आलेल्या सोने-चांदी, हिरे-माणिक्य आणि अष्टधातूच्या 1250 शिळा आता ‘गायब’ झाल्या आहेत.
या शिळा 2002 पर्यंत कारसेवकपुरममध्ये होत्या. मातीच्या पूजित शिळा आजही कारसेवकपुरममध्ये ठेवलेल्या आहेत, परंतु धातूच्या शिळा कुठेही दिसत नाहीत. संतोष दुबे यांच्या मते, सोने-चांदीच्या शिळांच्या देखभालीची जबाबदारीही ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे होती.
या शिळा कारसेवकपुरममध्ये जिथे सुरक्षित ठेवल्या होत्या, तिथे 3 कुलूपे होती. मग या शिळा कुठे गायब झाल्या, हे कोणालाही माहीत नाही.

सवा रुपया दे दे रे भैय्या रामशिलेच्या नावाचा…
श्रीराम मंदिर आंदोलनाशी संबंधित संतोष दुबे यांनी दैनिक दिव्य मराठीला सांगितले, ‘श्रीराम मंदिरासाठी 1985 मध्ये ‘श्रीराम जन्मभूमी न्यास’ स्थापन झाला. त्याचे अध्यक्ष परमहंस रामचंद्र दास होते. न्यासात विहिपचे अशोक सिंघल, गिरिराज, रामविलास वेदांती, चंपत राय यांच्यासह अनेक लोक होते.
श्रीराम मंदिर आंदोलनाला गती देण्यासाठी 1989 मध्ये विहिपने पहिली मोठी मोहीम सुरू केली. घोषणा देण्यात आली- ‘सवा रुपया दे दे रे भैय्या रामशिलेच्या नावाचा, रामाच्या घरात लागेल दगड तुझ्या नावाचा.’
या अभियानात विहिपने प्रत्येक व्यक्तीला सव्वा रुपया, म्हणजे एका घरातून 5 ते 10 रुपये देणगी देण्यास सांगितले. त्याचबरोबर घरोघरी जाऊन पूजित शिळाही मागितल्या. विहिपने सांगितले होते की, श्रीराम मंदिराच्या बांधकामात या शिळांचा वापर केला जाईल. या अभियानाने देशभरात श्रीराम मंदिराच्या आंदोलनाला गती दिली. लोकांनी भरभरून दान दिले.’
ते पुढे म्हणतात, ‘मी तर अयोध्येतच राहतो. तेव्हा कारसेवकपुरमशी जोडलो गेलो होतो. माझे काम अशा शिळांचा हिशेब ठेवण्याचे होते, ज्या सोने-चांदी, हिरा, माणिक्य, अष्टधातू आणि इतर महागड्या धातूंनी तयार करून पाठवल्या जात होत्या.
तेव्हा माझे वय 22-23 वर्षांचे असेल. माझ्यासोबत या गणनेत तेव्हा संघाचे एक प्रचारक डॉ. रामविलास वेदांती आणि परमहंस रामचंद्र दास सहभागी होते. डॉ. रामविलास वेदांती आणि परमहंस रामचंद्र दास आज या जगात नाहीत.’

सर्वात महागडी शिळा मॉरिशसवरून आली, मुंबईच्या व्यापाऱ्याने हिरे जडवलेली शिळा दिली होती
संतोष दुबे दावा करतात, ‘सोन्या-चांदीच्या आणि अष्टधातूच्या या शिळांची एकूण संख्या 1250 होती. परमहंस रामचंद्र दासजी सांगायचे की, या शिळांमध्ये सर्वात महागडी शिळा मॉरिशसची होती. मुंबईच्या एका व्यापाऱ्याने जी शिळा पाठवली होती, त्यावर हिरे जडवलेले होते. सर्वात जास्त चांदीच्या, त्यानंतर सोन्याच्या शिळा होत्या.’
3 कुलुपांच्या आतून 2002 नंतर ‘गायब’ झाल्या शिळा
या शिळा ट्रस्टचे अध्यक्ष परमहंस रामचंद्र दास यांच्या निर्देशानुसार विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्या होत्या. शिळांच्या सुरक्षेसाठी त्या जिथे ठेवल्या होत्या, तिथे 3 कुलूपे लावण्यात आली होती. 2002 पर्यंत या शिळा तिथे होत्या. त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही.
संतोष दुबे म्हणतात, ‘यामागे चंपत राय यांची भूमिका आहे. ते दावा करतात की परमहंस रामचंद्र दास याच धक्क्याने आजारी पडले आणि 2 वर्षांनी त्यांनी प्राण सोडले. डॉ. रामविलास वेदांती भीतीमुळे बोलू शकले नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की श्रीराम मंदिराच्या नावावर मिळणाऱ्या दानातील सोने-चांदीची चोरी आज नाही, तर 1989 पासूनच सुरू झाली होती.’

शिळा अयोध्येत पोहोचल्यानंतर रामसेवकपुरममध्ये ठेवल्या जात होत्या.
श्रीराम मंदिर मॉडेलच्या दानपेटीतील देणग्यांचाही कोणतेही रेकॉर्ड नाही
संतोष दुबे म्हणतात, ‘कारसेवकपुरममध्ये विहिपने श्रीराम मंदिराचे मॉडेल ठेवले होते. त्याच्या समोर एक दानपेटी ठेवली होती. यातही देशभरातून येणारे भाविक दान करत होते. या दानपेटीत 50 रुपयांपेक्षा जास्त दान देणाऱ्यांना पावती दिली जात होती. म्हणजे, यापेक्षा कमी रकमेचा कोणताही हिशेब नव्हता.
या दानपेटीत दरमहा पाच ते 7 लाख रुपये जमा होत होते. दान देणाऱ्या व्यक्तीला त्या बदल्यात श्रीराम मंदिर मॉडेलचा एक फोटो दिला जात होता. तेव्हाही विहिपकडून देणगीतून मिळालेली रक्कम कधीही सार्वजनिक करण्यात आली नाही.’

ट्रस्ट स्थापनेच्या वेळी न्यासाच्या खात्यात फक्त 8.50 कोटी रुपयेच दाखवण्यात आले
संतोष दुबे म्हणतात, ‘5 फेब्रुवारी 2020 रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली. त्यावेळी न्यासाला त्यात समाविष्ट करण्यात आले. त्यावेळी न्यासाच्या खात्यात फक्त 8.50 कोटी रुपये दाखवण्यात आले होते. तेव्हाही सोने-चांदीच्या शिळांचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता.”
त्यानंतर ट्रस्टने समर्पण आणि सहयोग निधी अभियान राबवले. ऑनलाइनही देणग्या घेण्यात आल्या. घरोघरी चालवलेल्या समर्पण निधीसाठी पावतीही देण्यात आली. मात्र, पावती आणि देणगीतून मिळालेल्या रकमेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आधी न्यासमध्ये आणि आता ट्रस्टमध्ये चंपत राय हेच सर्वेसर्वाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याकडून कधीही पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला नाही, असा आरोप आहे.’

साडेचार वर्षांत 61 कोटी भाविकांनी दर्शन घेतले
श्रीराम मंदिरात दर्शनासाठी २०२२ पासून आतापर्यंत साडेचार वर्षांत ६१.५३ कोटी लोक पोहोचले. सूत्रांनुसार, दर्शनासाठी जाणारा सामान्य व्यक्तीही किमान १० रुपये श्रद्धेने नक्कीच अर्पण करतो. या हिशोबाने ६०० कोटी रुपये लोकांनी फक्त दानपेट्यांमध्ये दान केले. यात महिलांनी दान केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चर्चा केली जात नाहीये.
२०२४ मध्ये चंपत राय यांनी जेव्हा देणगीचा तपशील दिला होता, तेव्हा त्यांनी १३ क्विंटल चांदी आणि २० किलो सोन्याचा उल्लेख केला होता. २०२५ मध्ये सुमारे ३० कोटी लोकांनी दर्शन घेतले. या हिशोबाने २०२५ मध्ये सुमारे ३०० कोटींची देणगी यायला हवी.
तर, १ एप्रिल, २०२५ ते २८ फेब्रुवारी, २०२६ चा जो अहवाल ट्रस्टने २१ मार्चच्या बैठकीत सादर केला होता, त्यात फक्त ५४ कोटी रुपये दाखवले होते. आता जर २०२६ बद्दल बोलायचे झाल्यास, जानेवारी ते १५ जूनपर्यंत सुमारे ७ कोटी लोकांनी दर्शन घेतले आहे.

