मी ओबीसी नाही, हे लक्ष्मण हाके यांनी कोणत्या आधारे म्हटले आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. विदर्भातील लोक हे तब्बल चार पिढ्यांपासून ओबीसी आहेत, असे म्हणत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाकेंवर निशाणा साधला आहे.
.
बबनराव तायवाडे म्हणाले की, कुणबी समाजाची नोंद काका कालेलकर आयोगाच्या यादीत स्पष्टपणे होती. त्यापूर्वी मंडल आयोगाने काढलेल्या नोंदींमध्येही ही सूत्रे होती. त्यानंतर 2004 मध्ये ‘कुणबी-मराठा’ आणि ‘मराठा-कुणबी’ या उपजातींचा यामध्ये अधिकृत समावेश करण्यात आला. जर हे पुरावे नसतील, तर मग नक्की कोण ओबीसी आहे हे हाके यांनीच सांगावे. आम्हाला आमच्या ओबीसी ओळखीसाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.
संविधानिक मागण्यांसाठी 58 जीआर काढायला लावले
बबनराव तायवाडे म्हणाले की, आमच्याकडे पिढीजात ओबीसींचे प्रमाणपत्र आहे, म्हणूनच आम्ही ओबीसी हक्कांची चळवळ चालवत आहोत. याच आधारावर आम्ही महाराष्ट्रासह दिल्लीतही राष्ट्रीय स्तरावर काम करत आहोत. आम्ही कोणाचीही राजकीय विचारधारा घेऊन चालत नाही. ओबीसींच्या संविधानिक मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला 58 शासन निर्णय काढावे लागले.
2016 पूर्वीच्या परिस्थितीवर भाष्य आणि हाकेंवर बोलणे टाळले
बबनराव तायवाडे म्हणाले की, 2016 पूर्वी ओबीसींची परिस्थिती काय होती आणि आज काय परिस्थिती आहे, याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. 2016 नंतर कोणत्या सोयी-सुविधा आणि सवलती मिळाल्या, हे आमच्याइतक्या हक्काने इतर कोणीही सांगू शकत नाही. हाके यांनी काहीही बोलावे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी माझ्यावर टीका केली असली तरी मी त्यांच्यावर आता काहीही बोलणार नाही. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणे आता बंद केले आहे.
संविधानाच्या चौकटीत मागण्या कराव्यात
बबनराव तायवाडे म्हणाले की, गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू असल्याने मुंबईत लाखो लोकांची गर्दी असेल, अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागल्यास मोठे प्रकरण उद्भवू शकते. आंदोलकांनी संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत बसणाऱ्याच मागण्या कराव्यात, तरच सरकार त्या पूर्ण करू शकते, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलाताना म्हटले आहे. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वाचा सविस्तर