![]()
कन्नड तालुक्यातील अंधानेर येथील तरुण शेतकऱ्याला वायरमनच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अंधानेर-नावडी शिवारात घडली. सुरेश विठोबा दापके ( ३५, रा. अंधानेर) असे मृताचे नाव आहे.
.
वादळी पावसामुळे सुरेश दापके यांच्या शेतातील रोहित्राचा डीओ पडला होता. याविषयी दापके यांनी महावितरणला माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी दुपारी परमिट मिळाल्याचे सांगत वायरमन संदीप चव्हाण याने, मी इथेच आहे, तुम्ही डीपीवर चढून डीओ टाका, असे सांगत दाबके यांना डीपीवर चढवले. तिसरा डीओ टाकत असतानाच अचानक वीजपुरवठा सुरू झाला. क्षणार्धात विजेचा धक्का बसल्याने सुरेश दापके यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला महावितरणचे वायरमन संदीप चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत आणि डॉ. संजय गव्हाणे यांनी केला आहे. मृत सुरेश दाबके यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून ते कुटुंबातील एकमेव कमावते होते.
शेतकऱ्याने दुरुस्तीसाठी परमिट घेतले होते Ã रोहित्रावरील तीन डीओ गेले होते. यासाठी शेतकऱ्याने परमिट काढले होते. मात्र, ही दुर्घटना घडली. वायरमन संदीप चव्हाण आणि ऑपरेटर मला भेटलेले नाहीत. मी रुग्णालयात गेलो असता नातेवाईक संतप्त होते. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. – व्ही. एम. कोळेकर अभियंता, ग्रामीण, विद्युत वितरण कंपनी.