![]()
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ५९ जातींच्या नागरिकांनी आज, बुधवारी अमरावतीत तीव्र रोष व्यक्त केला. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र हाणून पाडण्याचा निर्धार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या संयुक्त महामोर्चाचे नेतृत्व खासदार बळवंतराव वानखडे, विद्यापीठ ऑफीसर्स फोरमचे डॉ. नितीन कोळी, रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, प्रा. जगदीश गोवर्धन, प्रा. बंडू गवई आणि नयन मोंढे यांनी केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चेकरी एकत्र जमले आणि भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. मोर्चेकऱ्यांच्या मते, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेला निर्णय सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांना धक्का देणारा आहे. हा निर्णय लागू झाल्यास एकसंध असलेली अनुसूचित जातीची एकजूट विस्कळीत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चाच्या शेवटी झालेल्या सभेत पुढाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार आरक्षणाबाबत आकस बाळगून असून, ते आडवळणाने आरक्षण संपवू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे त्याच षडयंत्राचा एक भाग असून, अधिक तीव्र आंदोलन करून ते हाणून पाडले पाहिजे, असा संकल्प यावेळी करण्यात आला. सरकारने निर्णय न बदलल्यास भविष्यात उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. सभा सुरू असतानाच मोर्चेकऱ्यांच्या एका प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. हे निवेदन शासनाकडे पाठवून आपल्या तीव्र भावना राज्यकर्त्यांना कळवाव्या, अशी मागणी त्यांनी केली. या मोर्चात जिल्हाभरातील आंबेडकरी जनता, आंबेडकरवादी राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना तसेच चळवळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांची संख्या अधिक असल्याने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे ऐनवेळी वाहतूक व्यवस्थेत बदल करत मांगीलाल प्लॉट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतची वाहतूक एकदिशा करण्यात आली.
Source link
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:आरक्षण संपवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप; शासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त