![]()
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज आणि मुंबईतील चेंबूर येथे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेलेला बळी, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. “आंदोलकांवर लाठ्या चालवणारे पोलीस ‘कायर’ आहेत आणि बीएमसीच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पंतप्रधान मोदींपेक्षाही जास्त इगो आहे,” असा घणाघात देशपांडे यांनी केला. या बेजबाबदार व्यवस्थेविरोधात उद्या सकाळी ११ वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर मनसेतर्फे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ‘जनरल डायर’ची आठवण अन् पोलिसांना सवाल दिल्लीमध्ये सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा देशपांडे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “काल दिल्ली पोलिसांनी ज्या प्रकारे अमानुष लाठीचार्ज केला, तो जालियनवाला बागेत गोळीबार करणाऱ्या जनरल डायरसारखाच होता. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे हे पोलिस जनरल डायर नाहीत, तर ते ‘कायर’ आहेत. दादरमधील आंदोलनातही पोलिसांनी मुलींचे केस ओढल्याचा आरोप त्यांनी केला. “पोलिसांनी पोलिसांसारखे वागावे, गुंडांसारखे नाही. त्यांनी हे लक्षात ठेवावे की ते शेवटी जनतेला उत्तरदायी आहेत, सरकारला नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. ‘मोदींनी स्वतःचे जुने भाषण ऐकावे’ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना देशपांडे म्हणाले की, “विरोधात असताना नरेंद्र मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आंदोलकांवर लाठीचार्ज न करण्याचा सल्ला द्यायचे. आता मोदींनी स्वतःचे तेच जुने भाषण पुन्हा ऐकले पाहिजे.” ब्रिटिश सरकारही गांधीजींशी चर्चा करायचे, पण हे सरकार विद्यार्थ्यांशी बोलायलाही तयार नाही. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी कोणाची तरी जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ज्या विद्यार्थ्यांनी या हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला, त्यांना मनसेचा सलाम असल्याचेही ते म्हणाले. ‘अश्विनी भिडेंना मोदींपेक्षा जास्त इगो’ चेंबूरमध्ये अंगावर झाड पडून एका चिमुरड्याचा आणि दुसऱ्या घटनेत गटारात पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर बोलताना देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. “पालिकेने या मृत्यूंची जबाबदारी कोणावरही निश्चित केलेली नाही. अहवालात कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. गार्डन विभागात ११ वर्षांपासून एकच अधिकारी बसून आहे, कंत्राटदाराला फक्त थातूरमातूर दंड लावला गेला, पण अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “बीएमसीच्या आयुक्त अश्विनी भिडे यांचा इगो मोदींपेक्षाही जास्त आहे. आम्ही दिलेल्या पत्राला त्या उत्तर देत नाहीत आणि भेटतही नाहीत,” अशी टीका त्यांनी केली. उद्या आझाद मैदानावर मनसेचे आंदोलन सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, “जर आपण या हुकूमशाहीविरोधात आताच लढलो नाही, तर येणारी पुढची पिढी आपल्याला ‘षंढ’ म्हणेल,” अशी भीती देशपांडे यांनी व्यक्त केली. या संपूर्ण भोंगळ आणि कोणाचीही जबाबदारी निश्चित न करणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मनसेतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमचे आंदोलन अधिकाऱ्यांविरोधात नसून या बेजबाबदार प्रशासनाविरोधात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. हेही वाचा.. CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा
Source link
अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:विद्यार्थ्यांवरील अन्याय अन् चेंबूर दुर्घटनेतील दोषींवर कारवाईसाठी उद्या मनसेचे आंदोलन