![]()
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास न्यायचा असेल, तर पारंपरिक सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेला महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्याच्या जल व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत भंडारदरा प्रकल्पाच्या सात्रळ परिसरांतील प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती कामांचे भूमिपूजन मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. आ. अक्षय कर्डिले, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, गणेश हापसे, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाठ, माजी उपाध्यक्ष विश्वासराव कडू, अॅड. आप्पासाहेब दिघे, बाळकृष्ण चोरमुंगे, विजय लगड वसंतराव डुक्रे,सुरेश वाबळे, दिलीपराव डुक्रे,बाळासाहेब दिघे,मच्छिंद्र अंत्रे, हिराबाई पाटोळे,अलका दिघे, दत्ता पाटील, प्रकाश ताठे आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, राज्यातील धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला तरी कालव्यांमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. ही गळती रोखण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली चारी-पोटचारी तसेच कालव्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भंडारदरा, निळवंडे आणि जायकवाडी धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय्य पद्धतीने पाणी मिळेल, असे नियोजन जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, अनेक वर्षांपासून रखडलेल्या कालवे, चारे आणि पोटचारे दुरुस्तीच्या कामांना आता गती मिळाली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल आ. अक्षय कर्डिले यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती मिळत असल्याचे सांगितले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी कालवे, चारे व पोटचारी दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचे सांगितले.
Source link
कालव्यांची गळती थांबणार; दुरुस्तीसाठी 150 कोटींचा निधी:भंडारदरा, जायकवाडीच्या पाण्याचे न्याय्य नियोजन करणार- मंत्री विखे