![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प व अंधेरी संकुल हे 15 वर्षांसाठी भाड्याने देऊन जवळपास 100 कोटींचा घोटाळा केला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर उपरोक्त आरोप केले. ते म्हणाले, किशोरी पेडणेकर यांनी मुलुंडचे कालिदास नाट्यगृह संकल्प व अंधेरी येथील शहाजीराजे संकुल 15 वर्षांसाठी एका प्रायव्हेट डेकोरेटरला भाड्याने दिली. त्यातून त्यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. या कलाक्रीडा संकुलाची जमीन महापालिकेची आहे. 1989 मध्ये ललित कला प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मुंबईकरांसाठी पूर्व उपनगरासाठी कालिदास संकुल व पश्चिम उपनगरातील लोकांसाठी शहाजीराजे संकुल होते. येथे कला, क्रीडा, नाट्य, ललितकला अकादमी यांच्या विकासासाठी ही संकुले उभी करण्यात आले. पण 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किशोरी पेडणेकर यांच्या महापौरपदाच्या काळात त्यांनी कोणतेही अधिकार नसताना व कायद्यात तरतूद नसताना 15 वर्षांसाठी दोन्ही ठिकाणची सगळी सुमारे 20 एकर 9 लाख चौरस फूट जागा या दोन डेकोरेटर्सना दिल्या. हे केवळ बेकायदाच नव्हे तर त्यांनी डेकोरेटर्सचा तब्बल 100 कोटींचा फायदा करून दिला. याविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. ठाकरे गटाच्या माफिया, कंत्राटदारांनी कसे लुटले याचे एक मोठे उदाहरण आहे. त्यामुळे तत्काळ हे कंत्राट रद्द करण्यात यावे. तसेच या प्रकरणात हात असणाऱ्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. मतीन पटेल यांच्यावरील बुलडोझर कारवाईचेही समर्थन किरीट सोमय्या यांनी यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईचेही जोरदार समर्थन केले. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल हा कॉर्पोरेट जिहादचा मुख्य आरोपी आहे. त्याचे अनधिकृत घर तोडण्याचे काम महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी केले त्यांना मी धन्यवाद देतो. एमआयएमचे नेते चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ते या प्रकरणी टीका करत आहेत. पण या सगळ्या बेईमान लोकांनी डझनभर हिंदू तरुणींचे आयुष्य उद्धवस्त केले. त्या लोकांनाही तोडायला पाहिजे. ते 20 वर्ष बाहेर येणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ, असे ते म्हणाले.
Source link