![]()
शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभागातील विकासकामांना गती देतानाच कामांचा दर्जा कायम राखण्यासाठी नगरसेविका दिपाली रामनाथ बंग यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केली. त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती मलनिस्सारण योजनेतर्गत सुरू असलेल्या खालचा गणपती ते मौलाना आझाद चौक रस्त्याच्या पहिल्या लेयरच्या कामाची त्यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी नगरपरिषदेचे अभियंता विशाल मढवई, माजी नगरसेवक रामनाथ बंग, प्रकल्प व्यवस्थापक हंसराज जडेजा, योजनेचे पर्यवेक्षक मानस पाल तसेच संबंधित कर्मचारी व कामगार उपस्थित होते. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना बंग यांनी केवळ काम सुरू आहे एवढ्यावर समाधान न मानता बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, रस्त्याची प्रत्यक्ष स्थिती, कामाची तांत्रिक पद्धत, लेयरची गुणवत्ता आणि एकूण कामाचा दर्जा यांची बारकाईने पाहणी केली. त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संबंधितांकडून कामाची माहिती घेतली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने कामाला गती देऊन ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापनाला दिल्या. प्रभागातील विकासकामे ही नागरिकांच्या पैशातून आणि त्यांच्या सुविधेसाठी होत असल्याने त्यांच्या गुणवत्तेबाबत तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे बंग यांनी स्पष्ट केले.
Source link
विकासकामे नागरिकांसाठी; दर्जाशी तडजोड कदापि नाही:रस्ता कामाची नगरसेविका बंग यांनी केली पाहणी