![]()
मानवी देह म्हणजे केवळ काळाचे धन आहे. कुबेराची संपत्ती जरी अथांग असली, तरी या नश्वर देहावर व भौतिक सुखांवर मानवाचा खरा अधिकार कितीसा आहे? शेवटी हा देह मातीत जाणार आहे, त्यामुळे वेळेतच सावध होऊन संसाराच्या मोहातून मुक्त झाले पाहिजे. आणि कर्तव्य म्हणून समाजासाठी शक्य ते योगदान दिले पाहिजे, असा उपदेश कृष्णा महाराज कमानकर यांनी केला. मानूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी कृष्णा महाराज कमानकर यांनी मार्मिक दृष्टान्तांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आजची सेवा सुनील सोनवणे, शिवाजी पवार यांच्या सहकार्याने झाली. सप्ताहाचे तिसरे पुष्प गुंफताना कृष्णा महाराजांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराजांच्या विचारांचा आलिया संसार उठा वेग करा शरण जा उदार पांडुरंगा ॥ देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे ॥ हा अभंग घेत उपस्थितांना आत्मपरिक्षण करायला लावणारे विचार मांडले. मनुष्य आयुष्यभर पैशामागे आणि कुटुंबामागे धावतो, पण मृत्यू अटळ आहे. त्यामुळे मनुष्याने आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विचार करून सर्व धर्म समभावाची भावना ठेवून देव, देश आणि धर्मासाठी योगदान द्यावे. असा संदेश महाराजांनी दिला. या प्रसंगी गायनाचार्य निखिल महाराज खालकर, जालिंदर महाराज आळंदी, विठ्ठल महाराज शास्त्री, मृदुंगाचार्य सावता महाराज कळवाडीकर, विणेकरी संदानशीव महाराज यांनी विविध अभंगांचे प्रमाण सादर करत कीर्तनात रंगत आणली. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्यने या कीर्तनाचा लाभ घेत आहेत. मार्कंडेश्वर भजनी मंडळाचे सर्व सदस्य आणि दमोताई वारकरी आध्यात्मिक शिक्षण संस्था कंधाने येथील टाळकरी विद्यार्थी उपस्थित राहून योगदान देत आहेत. मानूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी किर्तनात उपदेश करताना कृष्णा महाराज कमानकर.
Source link
कीर्तन सप्ताह:मनुष्याने सर्व धर्म समभावाची भावना ठेवून देश व धर्मासाठी द्यावे योगदान