![]()
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. निलंगा तालुक्यातील पौळ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनीमनोहर पौळ (30) या महिलेने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी घेतली. यात अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांची मुलगी क्रांती या तिघा मायलेकांचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांची मुलगी वीरा गंभीर जखमी आहे. तिच्यावर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. नंतर तिला धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिची प्रकृती गंभीर आहे. अश्विनी या एमएसएफमध्ये नोकरी करत होत्या. 4 महिन्यांपूर्वी त्यांनी पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली होती. मागील 4 महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या. पती व सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी केला आहे. अश्विनीचे वडील तानाजी मोहिते यांनी मुलीच्या मृत्यूस पती व सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. पतीकडून तिला नेहमी त्रास दिला जात त्यांनी सांगितले. अजिंक्य आईसोबत गेला अन् जीव गमावला अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक असून कुस्तीशी त्यांचेही नाते आहे. घटनेच्या वेळी ते प्रशिक्षणासाठी लोहारा येथे गेले होते, तर आई व भाऊ हिप्परगा येथे गेले होते. त्यामुळे अश्विनी मुलांसह घरातून नेमक्या कोणत्या वेळी निघाल्या, याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. अजिंक्यला कुटुंबीय सहसा सोबत नेत असत. मात्र गुरुवारी तो आईसोबतच राहिला आणि दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पौळ कुटुंबियांच्या निकटवर्ती यांनी दिली. महाराष्ट्राची वाघीण अशी ओळख होती मृत अश्विनी पौळ या राष्ट्रीयस्तरावरील कुस्तीपटू होत्या.त्यांच्या कुटुंबातील वडील,भाऊ, आई आणि बहीण हे हीकुस्तीपटू आहेत. विशेष म्हणजे त्यांचे पती मनोहर पौळ हे देखील कुस्तीपटू आहेत.कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या अश्विनी यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुस्ती क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अश्विनी यांनी 5 सुवर्ण, 6 रौप्यपदके मिळवली होती अश्विनी मोहिते उत्कृष्ट कुस्तीपटू होत्या. शालेय जीवनापासून त्यांनी अनेक मैदाने गाजवले होती. कुस्तीची जिद्द पाहून वडिलांनी घरीच कुस्तीची तालीम तयार केली होती. तिच्या वडिलांना पण कुस्तीची आवड होती. शालेय स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचा अश्विनीने जिद्दीने यश मिळवले होते. 2007 मध्ये तिरुवनंतपुरम (केरळ) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक. 2008 व 2009: गुरुदासपूर (पंजाब) आणि चेन्नई येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. 2010 मध्ये भोपाळ, कानपूर आणि हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले होते, तसेच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा अश्विनीने गाजवल्या. कारकीर्दीत पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके पटकविली आहेत. कुटुंबीय बाहेरगावी जाताच पडल्या बाहेर अश्विनी या मागील 3 महिन्यांपासून आपल्या तीन मुलांसह माहेरी राहत होत्या. चार महिन्यांपूर्वी त्यांनी एमएसएफमधील नोकरी सोडली होती. गुरुवारी त्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर कशासाठी आणि कोणत्या वेळी गेल्या, याची माहिती कुटुंबीयांना नव्हती. कौटुंबिक वाद, नोकरी सोडण्याचे कारण किंवा अन्य काही कारणातून ही घटना घडली का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
Source link
कुस्तीपटू महिलेची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; 2मुलांसह आई ठार:सासरच्या त्रासामुळे आत्महत्या; विवाहितेच्या वडिलांचा आरोप