![]()
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वटवाघळांचा मृत्यू होण्याची ही राज्यातील बहुदा पहिलीच घटना असावी. चंद्रपूर, यवतमाळसह गडचिरोलीचेही तापमान चांगलेच वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील परिसरात चिंचाच्या झाडावर नेहमीच वटवाघळ वास्तव्य करत असतात. गेल्या 20-22 वर्षांपासून या चिंचाच्या झाडावर वटवाघळांचा जत्थाच मुक्कामी असतो. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच या पक्ष्यांना तापमान वाढीचा फटका बसला आहे. एवढे मोठे तापमान आणि उष्णता सहन न झाल्याने या झाडावरील एकाच वेळी 500 पेक्षा अधिक वटवाघळ मृत झाली आहेत. जंगलातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघडकीस वनपरीक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक जंगलातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर लोकांनी तिथे जाऊन पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. झाडाच्या खाली वटवाघळ मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. तसेच काही वटवाघळ हे झाडावरच लोंबकळत मृत झाली होती. त्यानंतर काही गावकऱ्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून या सर्व मृत वटवाघळांना पुरले, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या गडचिरोली जिल्ह्यात 46 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पाडण्याचे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाचे काम असल्याच घराबाहेर पडावे व आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
Source link
गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस