![]()
गेल्या काही महिन्यांपासून कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला असून, अवघ्या आठ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्यामुळे पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून, बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर, पिकअप, मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल १,६०० ते २,२०० रुपयांपर्यंत तर उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला ३,४०० रुपयांपर्यंतचा कमाल भाव मिळाला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने त्याचा थेट फायदा पैठण बाजारपेठेला झाला आहे. पैठण बाजार समितीत गुरुवारी ३,३०८ क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. यामध्ये दुय्यम दर्जाच्या कांद्याला किमान १५० ते १,२०० रुपये, सरासरी दर १,३०० ते २,२०० रुपये, तर उच्च दर्जाच्या कांद्याला २,३०० ते ३,४०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरात सुधारणा झाल्यामुळे दर्जेदार कांद्याला खरेदीदारांकडून पसंती दिली जात आहे. साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा दोन महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव कमालीचे घसरल्याने उत्पादक हवालदिल झाले होते. अनेक शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी हिंमत न हरता कांदा गोदामात किंवा चाळीत साठवून ठेवला होता, त्यांना आता या दरवाढीचा थेट फायदा झाला आहे. हा साठवलेला कांदा आता टप्प्याटप्प्याने बाजारात येत आहे. मागणीमुळे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता Ãदक्षिण भारतातील मागणी अशीच कायम राहिली आणि स्थानिक बाजारातील पुरवठा नियंत्रित राहिला, तर आगामी काळात कांद्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष बाजारभावातील चढ-उताराकडे लागले आहे. – नितीन विखे, सचिव, बाजार समिती, पैठण
Source link
कांद्याच्या भावामध्ये आठ दिवसांत 500 रुपयांची वाढ:पैठण बाजार समितीत 3,308 क्विंटलची आवक; 1,600 ते 2,200 रुपयांपर्यंत मिळाला दर