![]()
गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका निवासी आश्रमशाळेत झोपेत असताना सर्पदंश झाल्याने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा सुन्न झाला असून आश्रमशाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जपतलाई येथील या निवासी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे रात्री सर्व विद्यार्थिनी जेवण करून आपल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्रीच्या गाढ झोपेत असताना एका अत्यंत विषारी सापाने खोलीत घुसून तीन विद्यार्थिनींना दंश केला. रात्री उशिरा ही बाब आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या आणि इतर मुलींच्या लक्षात आली. कर्मचाऱ्यांनी तातडीने या विद्यार्थिनींना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू धानोरा येथील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर विद्यार्थिनींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला होता. गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिन्ही विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पालकांचा आक्रोश या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा अचानक आणि तडफडून मृत्यू झाल्याचे पाहून पालकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात एकच आक्रोश केला. आश्रमशाळेतील ढिसाळ कारभार, अस्वच्छता आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळेच निष्पाप आदिवासी लेकरांचा नाहक बळी गेल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. हे ही वृत्त वाचा
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ:अवघ्या 7 तासांत तब्बल 130 जणांना घेतला चावा; रेल्वेस्टेशन परिसरातही प्रवाशांवर हल्ले, अनेक जखमी
कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने रविवारी नागरिकांवर हल्ला करत तब्बल 130 हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जाणारे नागरिक, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक यांनाही या कुत्र्याने लक्ष्य केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, महापालिका आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित कुत्र्याला अखेर पकडले. रेल्वे स्थानक परिसरातही हल्ले खडकपाड्यातील घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही भटक्या कुत्र्याने प्रवाशांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, सकाळपासून 10 ते 15 जणांना कुत्र्याने चावा घेतला. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे नागरिक आणि रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. वाचा सविस्तर
Source link