![]()
पैठण शहरातील शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाड, लोखंडी पाइप आणि लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अबरार गुलामनबी कुरेशी (४०, रा. ग्रीन चौक, पैठण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून जमील इसाक कुरेशी, आरेफ इसाक कुरेशी, रिजवान आरेफ कुरेशी, एहसान आरेफ कुरेशी व जुनेद जमील कुरेशी (सर्व रा. नेहरू चौक, पैठण) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी पैठण शिवारातील गट क्र. ८६ मध्ये आरोपी काट्या व लाकडी खुंट्या लावून शेतजमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते. फिर्यादीने जाब विचारला असता, आरोपींनी शिवीगाळ करत कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर वार केला. तसेच इतर आरोपींनी लोखंडी पाइप व काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर ६ ऑगस्ट रोजी आरोपींनी पुन्हा फिर्यादीच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तळेकर करत असून, या घटनेत फिर्यादी जखमी झाला आहे.
Source link
जमिनीच्या वादामधून कुऱ्हाडीने हल्ला; 5 जणांवर गुन्हा दाखल:पैठणची घटना; डोक्यावर वार केल्याने फिर्यादी जखमी