![]()
शहरातील जुना मुंबई–आग्रा महामार्गावरील गिरणारे परिसरात पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूलाच इमारतीच्या पाया बांधकामासाठी सुमारे ३० बाय ३० फूट आणि ६ ते ७ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र, एवढा मोठा खड्डा मुख्य रस्त्यालगत असतानाही त्याभोवती कोणतीही संरक्षक भिंत, लोखंडी बॅरिकेड्स किंवा इशारा फलक लावण्यात आलेले नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे खड्ड्यात काठोकाठ पाणी साचल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. पंचायत समिती कार्यालय असल्याने या परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच गिरणारे गावाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ताही या खड्ड्यालगतून जातो. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना या खड्ड्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसामुळे खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने एखादे वाहन किंवा नागरिक थेट त्यात पडण्याची शक्यता आहे. खड्डा खोदण्यापूर्वी किंवा खोदल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. खड्ड्याभोवती तातडीने मजबूत संरक्षक व्यवस्था उभारून लोखंडी बॅरिकेड्स लावावेत. तसेच वाहनचालक आणि नागरिकांना धोक्याची सूचना देणारे फलक लावावेत, अशी मागणी होत आहे.
Source link
इमारतीसाठी खड्डा खोदला; नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष:इगतपुरी पंचायत समितीजवळ अपघाताचा धोका