![]()
हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी ता. 21 दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीन दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. हिंगोली तालुक्यातील नांदूरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे कामे झाले आहे. मात्र सदरील काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असून गावात पाणीही येत नाही तर गावात केवळ सहा इंच ते एक फुट खोलीवर जलवाहिन्या अंथरण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. गावात नळ योजना असूनही महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत संपूर्ण गावात नळ पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. दरम्यान, गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी शोभाबाई जाधव, सिता धोतरे, आशा धोतरे, संगिता जाधव, रंभाबाई शिंदे, रेखा शिंदे, लता कांबळे, सुदेशना कांबळे, संगिता कांबळे, नंदाबाई कांबळे, इंदीराबाई कांबळे, अलका कांबळे, अनुपमा कांबळे, पिंकू कांबळे, रुखमाबाई जाधव, मनीषा कांबळे यांच्यासह महिलांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढला. गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने महिलांची भर उन्हात पाण्यासाठी भटकंती होत असून गावात तातडीने पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा ता. २४ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
Source link
‘जल जीवन’चा बोजवारा!:हिंगोलीच्या नांदूरा येथील महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा; 24 मेपासून उपोषणाचा इशारा