Headlines

जुन्या रिक्षांचे होणार इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर:सरकार सकारात्मक, चार्जिंग अन् किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय – मंत्री सरनाईक




पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने जुन्या रिक्षांचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर करण्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. मंत्रालयात पेट्रोल, सीएनजीवर चालणाऱ्या जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर करणे आणि ईव्ही चार्जिंग सुविधा निर्माण करण्याबाबत शुक्रवारी एक बैठक आयोजित केली होती. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, सहआयुक्त संदेश चव्हाण, महानगर गॅसचे मुख्य व्यवस्थापक मुकेश पन्होत्रा, मुख्य वित्त अधिकारी राजेश पटेल, थ्री ईव्ही इंडस्ट्रीजचे संचालक करण कडाबा, सल्लागार महेश कडाबा, एक्सपोनंट एनर्जीचे अक्षत मोदी, इको सिस्टमचे इशांत मजबूदार उपस्थित होते. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षा ही संकल्पना शहरी भागात काळाची गरज झाली आहे. ईव्ही पॉलिसी धोरणानुसार ईव्ही गाड्या रस्त्यावर आणण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात असलेल्या रिक्षांची माहिती घ्या. चार ईव्ही कंपन्या असल्याने सर्वांना संधी द्यायची आहे. रिक्षा चालकांना परवडेल अशा किंमतीमध्ये ईव्ही रिक्षा तयार करा. ईव्ही रिक्षांच्या चार्जिंगसाठी महानगर गॅसच्या जागांचा वापर करता येईल. परिवहन विभागाकडून पाच वर्षांसाठी परवाना वाढवून देण्याचा प्रयत्न करू, मात्र रिक्षावाल्यांना एकदम पैसे भरणे परवडणार नसल्याने चार्जिंग आणि किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन, गॅसचे दर वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. इंधन आणि सीएनजीच्या खर्चात बचत होऊन रिक्षा चालकांना दिलासा देण्यासाठी जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतराबाबत शासन सकारात्मक आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. आतापर्यंत 447 जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांत रुपांतर थ्री ईव्हीचे संचालक करण कडाबा यांनी सादरीकरणातून कंपनीची माहिती दिली. जुन्या रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर आणि चार्जिंगबाबत थ्री ईव्ही आणि महानगर गॅसमध्ये दोन वर्षांपासून सामंजस्य करार करण्यात आला आहे. आतापर्यंत 447 जुन्या रिक्षाचे इलेक्ट्रिक रिक्षात रूपांतर केले असून बॅटरीची पाच वर्षांची वॉरंटी आहे. याचा खर्च दोन लाख असून मायलेज 140 किमी आहे. यातून इंधन, सीएनजी बचतीबरोबर वर्षाला 55 ते 75 हजार रूपयांची रिक्षा मालकांची बचत होत असल्याचे कडाबा यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राज्यात दोन लाख रिक्षा रिट्रीफिटेड (रूपांतरित) करण्याचे ध्येय असून मुंबईला रिट्रीफिट कॅपिटल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *