![]()
प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर समाजात वाढत्या दिखाऊपणा, अनावश्यक रूढी-परंपरांच्या पार्श्वभूमीवर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाने एक क्रांतीकारक आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक अमोल तिडके यांचे वडील स्व.भास्कर भाऊराव तिडके यांच्या निधनानंतर, पारंपरिक तेरवीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळा, खंडाळा खुर्द येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यासह इतरही समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा आदर्श निर्णय या कुटुंबाने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे. स्व.भास्कर तिडके यांचे मे २ रोजी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी देहदान करण्याचा खंबीर निर्णय घेतला होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे वेळ अधिक झाल्याने देहदानाचा हा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. याचे दुःख मनात असतानाच, तिडके कुटुंबाने खचून न जाता स्व.भास्कर तिडके यांच्या मानवतावादी व समाजसेवेच्या विचारांचा सन्मान करण्याचे ठरवले. तिडके कुटुंबाने नियोजित केलेल्या निधीतून जिल्हा परिषद शाळा, खंडाळा खुर्द येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप केले जाणार असून गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक सुमन सोनवणे यांना नगदी स्वरूपात आर्थिक मदत दिली जाईल, संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात सहाय्य केले जाईल, खंडाळा खुर्द येथील रेणुका माता मंदिराला आवश्यक वस्तू स्वरूपात मदत सुपूर्द केली जाईल. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पंजाबराव ऊर्फ भाऊसाहेब देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांच्या समाजप्रबोधनपर विचारांतून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील “हे तो चाळवा चाळवी, केले आपणा चि जेवी” आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील “जिवंत असता रोटी न दे, मेल्यावरी तेरवी श्राद्ध घालावे” या ओळींचा खरा प्रत्यय तिडके कुटुंबाच्या या कृतीतून गावकऱ्यांना आला आहे. हिच वडिलांना खरी श्रद्धांजली : अमोल तिडके माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार देहदान करण्याचा आमचा प्रयत्न होता, तो पूर्ण न झाल्याची खंत नक्कीच आहे. मात्र, त्यांच्या सामाजिक व मानवतावादी विचारांचा वारसा जपत आम्ही तेरवीसारखा पारंपरिक खर्च टाळला. शिक्षण, गरजू व्यक्ती आणि सामाजिक संस्थांना मदत करणे हीच वडिलांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी आमची भावना आहे. समाजानेही अशा अनावश्यक प्रथा बंद करून समाजहितासाठी पुढे यावे,अशा शब्दात अमोल तिडके यांनी प्रतिक्रीया दिली.
Source link
तेरवीचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण:खंडाळा खुर्द येथील तिडके कुटुंबाचा आदर्श निर्णय; जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा