![]()
पावसाळापूर्व कामांकडे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ज्ञानेश्वर कॉलनीतील शेकडो नागरिकांचे जीवन सध्या सांडपाण्याच्या संकटात सापडले आहे. साचलेल्या पाण्यामुळे बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप, फुटलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा दूषित होत असल्याची भीती आणि अतिवृष्टीत पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसस्थानक, पोलीस लाईन व गंगानगर भागातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक मार्ग मुख्य रस्त्यालगतच्या नालीवर टाकलेल्या मातीच्या भरावामुळे पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी परिसरात सांडपाण्याचे मोठे तळे तयार झाले असून त्याचा विळखा आता संपूर्ण ज्ञानेश्वर कॉलनीला पडला आहे.शहरात आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, साचलेल्या सांडपाण्यामुळे भूजल दूषित झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुर्गंधी, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, साचलेल्या सांडपाण्यातूनच शहराची मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनी जात असून ती काही ठिकाणी फुटल्याने गटाराचे दूषित पाणी थेट पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नळाद्वारे घराघरात दूषित पाणी पोहोचत असल्याने नगरपंचायत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा संतप्त आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. नालीवरील मातीचा भराव तातडीने हटवून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, साचलेल्या सांडपाण्याचा त्वरित निचरा करावा आणि फुटलेली जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करावी, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. तत्काळ कार्यवाही करणार : गांगुर्डे ^”ज्ञानेश्वर कॉलनीतील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. जेसीबीच्या साहाय्याने दोन ते तीन दिवसांत नाली मोकळी करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.” -सुनील गांगुर्डे, बांधकाम अभियंता, नेवासा नगरपंचायत
Source link
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:नेवासेतील ज्ञानेश्वर कॉलनीत समस्यांचा विळखा, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात