Headlines

नशामुक्त भारत अभियान:राज्यस्तरीय निबंध, चित्रकला अन् रील्स स्पर्धा; 21 जूनपर्यंत मोफत नावनोंदणीचे आवाहन




अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (एएनटीएफ) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम, त्याविरोधातील जनजागृती आणि व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. साहित्य, कला आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धांमध्ये घोषवाक्य (स्लोगन), निबंध लेखन, चित्रकला आणि रील्स निर्मिती या प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर, व्यसनमुक्त समाज निर्मितीवर तसेच युवकांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 21 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. हा सहभाग विनामूल्‍य करण्यात आला आहे. दरम्यान, 26 जून रोजी ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. मोठ्या संख्यने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन टास्‍क फोर्सच्‍या विशेष पोलिस महानिरीक्षक ज्‍योतीप्रिया सिंग यांनी केले आहे. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या एनएसएस विभागाशी तसेच अमली पदार्थ टास्‍क फोर्सचे उपनिरीक्षक अक्षय सरोदे यांच्‍याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *