Headlines

नागरिकांचे हाल:पिंपळगाव रेणुकाईच्या रस्त्यावर पाण्याचे तळे, गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास




भोकरदन तालुक्यातील जुईधरण फाटा ते वालसांवगी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ रस्ता खोदून ठेवलेल्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. मोठे डोह तयार झाले आहेत. वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रोज अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जुईधरण फाटा ते वालसांवगी फाटा हा सुमारे ३५ किलोमीटरचा रस्ता आहे. विदर्भ, खान्देश या दोन भागांना जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. आमदार संतोष दानवे यांच्या पाठपुराव्यातून शासनाने १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरणाचे काम सुरू झाले. काम काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने सुरू आहे. काम अद्याप पूर्ण झालेले नाही. काही भागात रस्ता तयार झाला आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. सर्वाधिक गंभीर स्थिती पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ आहे. ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे. पुढील काम संथ गतीने सुरू आहे. पावसामुळे खोदलेल्या भागात पाणी साचले आहे. पाण्याखाली खड्डे लपतात. दुचाकीस्वारांना अंदाज येत नाही. अनेक वाहने घसरून पडत आहेत. पलटी होण्याच्या घटनाही घडत आहेत. मालवाहू वाहनांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. पिंपळगाव रेणुकाई हे परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. दररोज शेकडो व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्याचा वापर करतात. बाजाराच्या दिवशी वाहनांची मोठी गर्दी होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनेकदा वाहतूक विस्कळीत होते. चिखल, खोल खड्डे, पाण्याने भरलेले डोह यामुळे प्रत्येक क्षणी अपघाताची भीती वाटत आहे. या स्थितीचा फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणासाठी रोज प्रवास करणाऱ्यांना वेळेत शाळा, महाविद्यालय गाठणे कठीण झाले आहे. दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वारंवार होत आहेत. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात आणताना अडचणी येत आहेत. मालवाहतूक उशिरा होते. आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ग्रामस्थांनी अनेक महिन्यांपासून अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेक तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास भोकरदन तालुक्यासह विदर्भ, खान्देश यांच्यातील दळणवळण गतिमान होणार आहे. व्यापार, शेती, शिक्षण, दैनंदिन प्रवासासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. कामातील विलंबामुळे हजारो नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शासनाने कोट्यवधींचा निधी दिला आहे. ठेकेदाराच्या संथ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची टीका होत आहे. स्थानिकांच्या मते पावसाळ्याचा विचार न करता रस्ता खोदून ठेवला. काम अर्धवट सोडले. पावसाचे पाणी साचले. परिस्थिती बिकट झाली. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. ठेकेदाराला उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. रोजच अपघात होत आहेत : पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. सलग पावसामुळे येथे गुडघाभर पाणी साचले असून खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोजच अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. -विजय देशमुख, ग्रामस्थ, पिंपळगाव रेणुकाई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *