![]()
भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. यावेळी कामकाजात सुलभता आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना एआयचे धडे देण्यात आले. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक गट विकास अधिकारी भगवान बच्छाव यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पंचायतराज आणि विकेंद्रीकरण व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचायतराज दिनानिमित्तच्या संदेशाचे वाचन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामस्थांनी केवळ लाभार्थी न राहता सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रशासकीय कामात आधुनिकतेची जोड देण्यासाठी आयोजित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता अर्था एआय प्रशिक्षण सत्र. विशाल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे सत्र घेण्यात आले, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख कसे करता येईल, याचे धडे यावेळी देण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे राहुल शेळके, बापूसाहेब नागरगोजे, दशरथ दिघे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जनतेचा सहभाग, जनतेचा विकास” आणि “सशक्त पंचायत म्हणजे सशक्त भारत” असा संकल्प करून कार्यक्रमाचा समारोप केला.
Source link
पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी