Headlines

पिकांसाठी घातक हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रात्यक्षिक तयारी:खरीप हंगामाची कृषी विभागाकडून पूर्वतयारी‎




खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हुमणी अळी नियंत्रण मोहिमेला गती देण्यात आली आहे. पूर्णानगर येथील शेतकरी उमेश महिंगे यांच्या शेतात तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांच्या उपस्थितीत हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पाणी फाउंडेशनच्या मेंटर रूपाली ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या जीवनचक्राबाबत, तिच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हुमणी अळी (व्हाईट ग्रब) ही खरीप पिकांसाठी अत्यंत घातक कीड मानली जाते. मे-जून महिन्यात पावसाळ्याच्या प्रारंभी तिचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होते. विशेषतः सोयाबीन व कपाशी या प्रमुख पिकांच्या मुळांवर हल्ला करून ती मोठे आर्थिक नुकसान घडवून आणते. जमिनीखाली राहून ही अळी पिकांची मुख्य व उपमुळे कुरतडते. परिणामी पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा खंडित होऊन झाडे पिवळी पडतात, निस्तेज होतात आणि अखेरीस चकत्यांच्या स्वरूपात वाळू लागतात. कृषी विभागाच्या माहितीनुसार, वेळेत नियंत्रण न केल्यास हुमणी अळीमुळे उत्पादनात ७० ते १०० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. सुरुवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणीचे संकटही उद्भवू शकते. तसेच एका हंगामात नियंत्रण न झाल्यास पुढील वर्षी किडीचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होण्याची शक्यता असते. हुमणी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक व्यवस्थापन पद्धती अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले. मान्सूनचा पहिला मोठा पाऊस झाल्यानंतर रात्री बाहेर पडणारे भुंगेरे गोळा करून नष्ट करणे, तसेच शेतात प्रकाश सापळ्यांचा वापर करून भुंग्यांचे प्रमाण कमी करणे, हे प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मेटॅरायझियम ॲनिसोपली किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीचा चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर केल्यास हुमणी अळीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. कच्चे किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरणे टाळावे, कारण ते हुमणीच्या भुंग्यांना आकर्षित करते, असा महत्त्वपूर्ण सल्लाही यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी रुणाली पाटकर, पाणी फाउंडेशनच्या मेंटर रूपाली ठाकरे तसेच गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते. नुकसान टाळता येऊ शकते आतापर्यंत आष्टी, आसरा, मारकी खारतळे, भातकुली, म्हैसपूर आदी गावांमध्येही हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली असून, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.”हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर सामूहिक प्रयत्न आणि वेळेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्यास खरीप पिकांचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते,”असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *