![]()
येथून जवळच असलेल्या धामणा बुद्रुक येथील पठार नदीला आलेल्या महापुरानंतर पुलालगतचा रस्ता काही ठिकाणी खचला आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र महापुरानंतर रस्ता खचल्याने या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पूल बांधण्यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पुलाची उंची वाढवून मोठा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती. पावसाळ्यात पठार नदीला वारंवार पूर येत असल्याने लहान पूल भविष्यात अडचणीचा ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र त्याकडे संबंंधित यंत्रणांकडून लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत अहे. यावर्षीच्या महापुरात पुलालगतचा रस्ता खचल्याने भविष्यात पुलालाही धोका निर्माण होण्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मजबूत संरक्षक भिंत, दगडी भराव, रस्त्याची तातडीने दुरुस्ती तसेच पुलाची उंची वाढवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच महापुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Source link
पुरानंतर धामणा बुद्रुक येथे पुलाजवळ रस्ता खचला:पुलाची उंची वाढवून उपाय करण्याची मागणी