![]()
प्रतिनिधी | अकोला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (माउंट अबू, राजस्थान) अंतर्गत ‘सुरक्षा सेवा प्रभागा’च्या वतीने अकोला येथे सकारात्मकता व मानसिक आरोग्यावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. भोपाळ येथून आलेल्या ब्रह्माकुमारी साक्षी दीदी, ब्रह्माकुमार शैलेंद्र भाई, बी. के. कमल भाई यांनी अकोला पोलिस मुख्यालय जिल्हा कारागृहात उपस्थिताना मार्गदर्शन केले. पोलिस मुख्यालयात बोलताना वक्त्यांनी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक शक्तीची जीवनातील आवश्यकता स्पष्ट केली. सकारात्मक विचारांनी आत्मबळ कसे वाढवावे. तसेच जीवनात परिवर्तन कसे घडवून आणावे, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “शरीर हे केवळ कर्म करण्याचे साधन असून, त्याला चालवणारी ऊर्जा म्हणजेच चैतन्य शक्ती किंवा आत्मा आहे,’ असे त्यांनी सांगितले. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मबळाची गरज असल्याचे सांगत, काही प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करुन घेण्यात आली. यातून सर्वांनी अध्यात्मातून ‘जीवन जगण्याची सुंदर कला’ अनुभवली. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमार विशाल भाई यांनी आभार मानले. संस्था अशा प्रकारची सेवा विनामूल्य देण्यास सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी कारागृह जिल्हा अधीक्षक दत्तात्रय गावंडे, महेंद्र जोशी, बी. के. भाई तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. बंदीजनांना चुकांमधून शिकण्याचा कानमंत्र सकाळी ९ ते १० दरम्यान अकोला जिल्हा कारागृहात बंदीजनांसाठी सत्र घेण्यात आले. “आपण भूतकाळ बदलू शकत नाही, परंतु वर्तमानकाळात शांतीत जगू शकतो,’ असा संदेश यावेळी देण्यात आला. कळत-नकळत झालेल्या चुकांमधून धडा घेत अध्यात्माद्वारे जीवन कसे सुख-शांतिमय बनवावे, हे त्यांना समजावून सांगण्यात आले. ब्रह्माकुमारी साक्षी दीदींनी योग कॉमेंट्रीद्वारे सर्वांना आत्मिक शांती व अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव दिला.
Source link
पोलिस कर्मचाऱ्यांसह कारागृहातील बंदीजनांना मानसिक स्वास्थ्याचे धडे:माउंट अबू येथील सुरक्षा सेवा प्रभागाच्या वतीने राबवला उपक्रम