![]()
महात्मा जोतिबा फुले हे केवळ क्रांतीकारक समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सामान्य माणसाला आर्थिक साक्षरता मिळावी म्हणून त्यांनी त्या काळात शेअर बाजाराचे कार्य कसे चालते, हे गीते आणि कवितांच्या माध्यमातून मांडले होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुलेंच्या विविधांगी कार्याचा गौरव केला. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने खानापूर येथे आयोजित महात्मा जोतिबा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक ‘ज्योती-सावित्री’ सीबीएसई शाळेचे लोकार्पण केले आणि विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, येथील लहान मुलींचे प्रगल्भ विचार पाहून त्यांच्यात खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचा वारसा दिसून येतो. विशेषतः नासा आणि इस्रोला गेलेल्या मुली आणि फ्रेंच-जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक वाटते. महात्मा फुलेंच्या ऑन्टरप्रिनर स्पिरिट’चे दर्शन मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुलेंच्या उद्योजकतेचा एक दुर्मीळ दाखला दिला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्यांपैकी महात्मा फुले हे एक प्रमुख कंत्राटदार होते. ब्रिटिशांनी त्या कामासाठी जेवढा खर्च मंजूर केला होता, त्यापेक्षा 15 टक्के कमी खर्चात फुलेंनी ते काम पूर्ण करून दाखवले. आजही मुंबई पालिकेत या प्रामाणिकपणाचा बोर्ड पाहायला मिळतो. केवळ पालिकाच नव्हे, तर कात्रजचा बोगदा, येरवडा कारागृह आणि रेल्वे वर्कशॉपच्या बांधकामातही त्यांच्या ‘ऑन्टरप्रिनर स्पिरिट’चे दर्शन घडते. हीच खरी मानवंदना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा फुले यांच्या नावाने राज्यात 1,000 नवीन कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेने ‘इंडस्ट्री 4.0’ च्या धर्तीवर 100 शाळांमध्ये अत्याधुनिक लॅब्स सुरू केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देणे, हीच महात्मा फुलेंच्या विचारांना खरी मानवंदना असल्याचे त्यांनी नमूद केले एक चांगले नगररचनाकार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिलाच, पण त्यासोबत शेतीमध्ये नवीन प्रजाती आणि फळबागांचे तंत्र विकसित करण्याचे मॉडेलही मांडले. शहराचे नियोजन कसे असावे, याबद्दल त्यांचे विचार प्रगत होते. पुणे नगरपालिकेचे कमिशनर म्हणून 7 वर्षे काम करताना त्यांनी शहराच्या रचनेत मानवी दृष्टिकोन जपला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शेधली देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता आणि महाराजांच्या स्मृती पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. अशा कठीण काळात महात्मा जोतिबा फुले यांनीच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचे तेज जनमानसात पुन्हा जागृत करण्यासाठी महात्मा फुले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आणि पुढे लोकमान्य टिळकांनी खऱ्या अर्थाने शिवजयंतीचा उत्सव सुरू करून महाराजांचा पराक्रम आणि विचार पुन्हा समाजात रुजवले, असे फडणवीस यांनी नमूद केले.
Source link
महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव:महात्मा फुलेंनी त्या काळी सामान्य माणसाला शेअर बाजारही शिकवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस