![]()
हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य गोदाम बघितले नसल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने हरभरा ठेवण्यासाठी खाजगी गोदामा भाड्याने घेतले आहे. या गोदामात सुमारे ४० हजार क्विंटल हरभरा ठेवण्यात आला असून सदर हरभरा नाफेड मार्फत खरेदी करण्यात आला आहे. शनिवारी ता. १३ झालेल्या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे गोदामावरील टीनपत्रे उडून गेली त्यामुळे गोदामातील हरभरा पिकाचे पोते भिजून गेले आहेत. दरम्यान, सदर गोदाम भाडेतत्वावर घेतांना कुठलेही निकष पाळण्यात आले नसल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. त्यामुळेच हरभऱ्याचे पिक भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकरी व नागरीकांचे म्हणणे आहे. याघटनेनंतर खडबडून जागे झालेल्या वखार महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिंगोलीत येऊन पाहणी केली आहे. या शिवाय नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी विमा कंपनीला कळविण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून अधिकारी हिंगोलीत ठाण मांडून बसले असून गोदामातील हरभरा सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. आता विमा कंपनीकडून सर्वेक्षण केल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याचा थेट आकडा मिळणार आहे. त्यामुळे विमा कंपनीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही – निलेश लांडे, विभागीय व्यवस्थापक वखार महामंडळ या परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणावर वादळी वारा होता. यामध्ये गोदामाचे टीनपत्रे उडालीच शिवाय त्यासाठी आधारासाठी बसविण्यात आलेले लोंखंडी अँगल तुटले आहे. गोदाम भाडेतत्वावर घेतांना सर्व निकष पाळण्यात आले आहेत. हरभरा पिकासाठी नवीन बारदाणा असल्याने जास्त नुकसान झाले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार काम केले जात आहे.
Source link
वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न