![]()
गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात मासेमारीचे जाळे काढण्यासाठी उतरलेल्या एका ६० वर्षीय मच्छीमाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष रंगिलदास बिरुटे (६०, रा. जुने कायगाव) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. नाशिक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी पात्रात मोठी आवक होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुभाष बिरुटे हे नदीत उतरले असता, किनाऱ्यावरील वीज वितरणाच्या तारा पाण्यात बुडाल्याने प्रवाहित झालेल्या विजेचा त्यांना जोरदार धक्का बसला. इतर मच्छीमारांनी तातडीने वीजप्रवाह खंडित करत बिरुटे यांना पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय केंद्रे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर जुने कायगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Source link
विजेचा धक्का:गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उतरलेल्या मच्छीमाराचा मृत्यू, गंगापूर तालुक्यातील जुने कायगावची घटना