![]()
सततच्या वीज खंडिततेमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने ढोराळे, इर्ले आणि मानेगाव परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. तडाखेबंद उन्हामुळे आधीच पिके संकटात सापडली असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेकडो शेतकऱ्यांनी हातात कुलूप घेऊन थेट वैराग येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज खंडित होत असल्याने विहिरी व बोअरवेलवरील पंप बंद पडत आहेत. परिणामी ऊस, भाजीपाला, मका, सोयाबीन तसेच इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून प्रत्यक्षात सुधारणा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी स्पष्ट केली. “पिके वाचवा, शेतकऱ्यांना न्याय द्या आणि अखंड वीजपुरवठा करा,” अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. कार्यालयाला कुलूप ठोकण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांशी उपकार्यकारी अभियंता रामकृष्ण डोंगरे आणि सुर्डी डिव्हिजनचे शाखा अभियंता अनुपम ओहाळ यांनी तातडीने चर्चा केली. ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात, बूथ प्रमुख अमोल शिंदे, पोलिस पाटील सरवदे, माजी सरपंच काकडे उपस्थित होते. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करत, तात्काळ उपाययोजना म्हणून सहा तास विनाअडथळा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या ठोस आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता डोंगरे यांनी नागरिकांना शासकीय योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहनही केले.
Source link
वीजपुरवठा सततचा खंडीत, पिकांचे नुकसान:6 तास विनाअडथळा विजेचे आश्वासन; आंदोलन मागे