Headlines

शिवसेना ठाकरे गटात फुटीची चर्चा:आदित्य ठाकरे म्हणाले- अफवांवर विश्वास ठेऊ नका, आमचे खासदार आमच्या सोबतच




महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. मात्र, काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. ते म्हणाले, मला वाटते की आपण अफवांवर विश्वास ठेऊ नये. उद्धव साहेब आणि मी, आम्ही एक पथ्य पाळले आहे की जे आमच्यासोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. काही काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत. ऑनलाइन बैठकीत उपस्थित राहण्यात चुकीचे काय? पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, सगळे खासदार जे काही निवडून आले आहेत 2024 च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेले आहेत. आम्ही असू, पवार साहेब असती आम्ही सगळ्यांनी प्रचार केला होता. लोकांनी मशाल या चिन्हावर निवडून आणले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीत आपण पाहिले असेल सगळेच लोक तिथे उपस्थित होते, काही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते आणि सगळे सोबत आहेत. तसेच ऑनलाइन येण्यात चुकीचे काय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. लोकशाही नष्ट होताना दिसत आहे काही खासदार फुटू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आपण पाहिले असेल की तृणमूल कॉंग्रेसमधले 20 खासदारांनी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळे एहसान फरामोश लोक आहेत. जिंकले ममता दीदींच्या नावावर आणि आता लगेच उड्या मारून पळत आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमची केस आता 4 वर्ष झाले चालू आहे, राष्ट्रवादीची सुद्धा सुरू आहे. तसे पाहायला गेले तर ही फार मोठी घटना आहे की एखादा पक्ष चोरून त्याचे नाव आणि चिन्ह देऊ शकते. आमचे म्हणणे एकच आहे की लोकशाही नष्ट होताना दिसत आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. आपण लोकांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे एकाच राजकीय गोष्टीवर चिटकून न राहता, महाराष्ट्रात अनेक विषय आहेत, देशात अनेक विषय आहेत त्यावर देखील आपण चर्चा केली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले, पक्ष तोडण्याच्या या ज्या गोष्टी आहेत ते देशात सगळीकडे सुरू आहे. आपण जगातली सर्वात मोठी लोकशाही होतो, आता आहेत असे वाटत नाही. आपण लोकांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे, राजकारणावरच बोलत बसलो तर लोक आम्हाला मूर्ख समजतील. शेतकरी कर्जमाफी म्हणजे उपकार केल्यासारखे शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही 2019 साली जे केले त्याला आम्ही कर्जमुक्ती म्हंटले होते. माफी कोणाला करतात गुन्हेगारांना, शेतकरी गुन्हेगार आहेत का? आम्ही कर्जमाफी न म्हणता तेव्हा कर्जमुक्ती म्हटले होते. आम्ही कुठल्याही अटी शर्थी न लावता आम्ही सरळ सेवा सुरू केली होती. आत्ता जी कर्जमाफी आहे ती उपकार केल्यासारखी आहे. म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की जवळपास 85 लाख महिलांचे जे काही लाडकी बहीण योजनेतले पैसे होते ते वळवले आहेत असे दिसत आहे. म्हणजे 85 लाख महिलांचा वापर केला, मतदान घेतले आणि आता सोडून दिले, त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यातून आता हे कर्जमाफी करत आहेत. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील वेताळ टेकडीचा विषय आहे, गणेश खिंडीचा विषय आहे, नद्यांचा प्रश्न आहे, हे सगळे विषय आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. मी पर्यावरण मंत्री असताना मी शाश्वत विकास करणार होतो. सरकार असो किंवा नसो हे करण्यासाठी मी आताही प्रयत्न करणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *