Headlines

'समाजात विद्वत्ता-नम्रतेचा संगम हवा':गुरुपौर्णिमेनिमित्त विद्या प्रबोधिनीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन




समाजात विद्वत्ता आणि नम्रता यांचा संगम होण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित समाजगुरुंच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, ज्यांच्याकडे विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे, त्यांनी अधिक नम्र असावे. तसेच, जे नम्र आहेत, त्यांनी अधिक कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा बाळगावी. आज सन्मानित झालेल्या समाजगुरुंमध्ये हा संगम दिसून येतो, असेही त्यांनी नमूद केले. हा सन्मान सोहळा विद्या प्रबोधिनी आणि पुनर्निर्माण सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी प्रास्ताविकात विविध क्षेत्रातील समाजगुरुंचा परिचय करून दिला. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे (नोबेल पुरस्काराचे सहमानकरी), डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन, निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, पुणे सार्वजनिक सभेचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे, लेखक व संपादक आनंद हर्डीकर, लेखिका आणि अनुवादक मृणालिनी सावंत, प्रसिद्ध गायक व दिग्दर्शक आनंद माडगूळकर, प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, विक्रमवीर शरद कुलकर्णी (सात खंडांमधील सर्वोच्च शिखरे सर करणारे), ग्रंथप्रसारक प्रदीप लोखंडे आणि इतिहास संशोधक अनुराधा कुलकर्णी यांचा चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित झाल्यानंतर डॉ. राजेंद्र शेंडे आणि आनंद माडगूळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राज्याचे शिक्षणमंत्री दरवर्षी विविध क्षेत्रातील समाजगुरुंचा आवर्जून सन्मान करतात, याबद्दल त्यांनी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. सहकार सुगंध मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले, तर अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *