![]()
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास 90टक्के मागण्या शासनाने पूर्ण केल्या आहेत, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित जलसंधारण मंत्र्यांच्या ‘जलमंथन’ परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनासह तापी मेगा रिचार्ज प्रकल्प, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आणि अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर सविस्तर भूमिका मांडली. 90% मागण्या पूर्ण; तब्येतीची काळजी घेऊन जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “जरांगे पाटलांनी केलेल्या जवळपास 80 ते 90 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. शैक्षणिक सवलती, आर्थिक लाभ, परदेशी शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या विविध योजना मराठा तरुणांसाठी युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत.” जात पडताळणीतील त्रुटी स्वाभाविक “लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्रे व व्हॅलिडिटी देण्यात आली आहे. दोन-चार प्रकरणांत कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वैधता नाकारली गेली असल्यास त्याचा विपर्यास केला जाऊ नये; कोणत्याही समाजात 100 टक्के प्रमाणपत्रे लगेच वैध ठरत नाहीत. त्यात दुरुस्तीची तरतूद असते.” मुंबईत येण्याची गरज भासणार नाही “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहेत. १२ तारखेला आंदोलकांना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही; त्याआधीच चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल. जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेऊन उपोषण मागे घ्यावे,” असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘जलमंथन’; तापी मेगा रिचार्जवर चर्चा नवी दिल्लीत देशभरातील जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘जलमंथन’ परिषदेबाबत महाजन यांनी माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठाचा वापर न करता मंत्र्यांमध्ये थेट मिसळून पाण्याचे नियोजन, पुनर्वापर, गळती रोखणे आणि जलस्त्रोत स्वच्छ ठेवण्यावर सखोल मार्गदर्शन केले.” “सातपुड्याच्या पायथ्याशी भूगर्भातील पाण्याची पातळी अत्यंत खोल गेली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मिळून भूगर्भात पाणी सोडणारा ‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्प राबवत आहोत. या प्रकल्पाची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली असून लवकरच कामाला गती येईल. काही ठिकाणी उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत आटल्याने अडचणी आल्या आहेत; तेथील स्त्रोत रिचार्ज करणे किंवा पर्यायी जलस्त्रोतांशी पाईपलाईन जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे.” नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, राहुल गांधींनाही निमंत्रण देणार नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा त्यांनी मांडला. “यावेळचा कुंभमेळा ऐतिहासिक होणार असून सुमारे 12 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचे अधिकृत ध्वजारोहण होईल, तर पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात मुख्य शाही अमृतस्नान पार पडेल.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि साधू-महंतांना आम्ही रीतसर निमंत्रण देणार आहोत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही कुंभमेळ्याचे अधिकृत निमंत्रण दिले जाईल. त्यांनीही नाशिकला येऊन कुंभमेळ्यात पवित्र डुबकी मारावी,” असे महाजन म्हणाले. अजितदादांच्या अपघातावरून एफआयआरच्या मागणीवर टीका दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून विरोधकांनी चालवलेल्या आरोपांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “या अपघाताची उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी सुरू असून यात कुठेही घातपात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आलेले नाही. सर्व बाबी स्पष्ट असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.” “अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या मुलांनी असा कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र, रोहित पवार आणि इतर विरोधक चार महिन्यांपासून या संवेदनशील प्रकरणाचा राजकीय वापर करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. हेही वाचा… अमित ठाकरेंवर 2 तासांत FIR, मग अजितदादांच्या अपघातावर का नाही?:सुप्रिया सुळेंचा थेट सवाल, म्हणाल्या- तपास कुठपर्यंत आला, हेच आम्हाला माहिती नाही! “एका महाविद्यालयातून केवळ फोटो हटवला म्हणून अमित ठाकरे यांच्यावर अवघ्या दोन तासांत गुन्हा (FIR) दाखल होतो. मात्र, सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा इतका मोठा भीषण विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो, तरीही सरकार साधा गुन्हा नोंदवत नाही. हा कुठला न्याय?” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. ठाणे दौऱ्यावर असताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी, वाढती महागाई, पक्षाच्या चिन्हाचा खटला आणि ठाण्यातील विविध नागरी समस्यांवरून राज्य सरकारवर परखड शब्दांत ताशेरे ओढले. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
सरकारने जरांगे पाटलांच्या 90% मागण्या पूर्ण केल्या!:गिरीश महाजन यांचे मोठे विधान; कुंभमेळा व अजितदादांच्या अपघातावरही भाष्य