![]()
“सबका मालिक एक’ आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचा सेवेचा मंत्र जपत शिर्डी संस्थानचे कार्य अविरत सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातील भाविकांनी साईचरणी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले. मात्र, हे दान केवळ संस्थानच्या तिजोरीत पडून न राहता, त्यातून सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि भुकेल्यांना अन्न छत्र पुरवले जात आहे. भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या पैशांचा थेट उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे प्रत्यक्ष दर्शन साई संस्थानच्या कारभारातून घडत आहे. यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान साईप्रसादालयात १ लाख ९४ हजार २८५ भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तसेच दर्शन रांगेतील १ लाख ६५ हजार २०० भाविकांना मोफत बुंदी प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांनी खरेदी केलेल्या २ लाख ३६ हजार लाडू पाकिटांमधून ७१ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. उत्सवासाठी आलेल्या लाखो भक्तांसह ३९ पालख्यांमधील पदयात्रींसाठी साईप्रसाद निवासस्थान, भक्त निवास आणि अतिरिक्त मंडपांमध्ये उत्तम निवास व्यवस्था करण्यात आली होती. दानातून गरजूंसाठी सेवा प्रकल्प उभारणी ^”साईबाबांना मिळालेल्या देणगीतून संस्थान भाविकांसाठी पायाभूत सुविधांसोबतच दोन अद्ययावत रुग्णालये, शैक्षणिक संकुल आणि भव्य प्रसादालय चालवत आहे. देणगीचा योग्य वापर करून लवकरच ३१ खाटांचे “डे केअर कॅन्सर हॉस्पिटल’ सुरू केले जाणार आहे. देणगीदार भाविकांचा योग्य सन्मान व्हावा यासाठी नवीन धोरण आखण्यात आले असून, उत्सवात ८५० साईसेवकांनी अहोरात्र सेवा बजावली.” – गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान, शिर्डी.
Source link
साईचरणी जमा होणाऱ्या दानातून फुलतेय जनसेवा:भाविकांच्या देणगीची रक्कम गरजूंसाठी आरोग्य अन् शिक्षणाच्या रूपात होते खर्च