![]()
वाढत्या महागाईचा फटका आता बेकरी व्यवसायालाही बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. बेकरी उत्पादनांसाठी आवश्यक तेल, साखर आणि मैद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने शहरातील बेकरी व्यावसायिकांनी पाव लादीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील बेकरी व्यावसायिकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत १ सप्टेंबरपासून पाव लादीचा होलसेल दर ४० रुपये, तर किरकोळ बाजारातील दर ५० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वराज बेकरीचे संचालक सलीम अन्सारी म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून बेकरी उत्पादनांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, या काळात साखर, तेल आणि मैद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. परिणामी उत्पादन खर्च वाढल्याने बेकरी व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे खर्चातील वाढ लक्षात घेऊन दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. जेके बेकरीचे संचालक पारितोष शिंदे यांनी सांगितले की, नाशिक, पुणे, बारामती आदी शहरांमध्ये बेकरी उत्पादनांच्या दरात यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर अहिल्यानगर शहरातही १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. बैठकीस सलीम अन्सारी, पारितोष शिंदे, सलमान मलिक, सादाब शेख, अन्सार अन्सारी, सलीम शेख, फैसल शेख, जिशान अन्सारी, सादाब अन्सारी, मुमताज शेख आदी उपस्थित होते.
Source link
साखर-तेल-मैदा महागले; 1 तारखेपासून ‘पाव’ही महागला, अहिल्यानगर शहरातपाव लादीच्या दरात वाढ