![]()
भुसावळकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका एसटी बसचे धावत्या प्रवासात जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील सावंगी टोल नाका परिसरात अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ५० प्रवाशांचे प्राण वाचले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना सुमारास घडली आहे. भुसावळ डेपोची (एमएच ०९ ईएम २५७५) ही बस छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास बस सावंगी परिसरातील टोल नाक्याजवळ आली असता, अचानक बसची ब्रेक यंत्रणा निकामी झाली. बसचे ब्रेक लागत नसल्याचे लक्षात येताच चालकाने घाबरून न जाता अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. महामार्गावर इतर वाहनांना धडक बसू नये आणि बसची गती कमी व्हावी यासाठी चालकाने मोठ्या कौशल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढवली. मातीच्या ढिगाऱ्यामुळे बसचा वेग मंदावला आणि बस सुरक्षितपणे थांबली. यामुळे बसमधील ५० प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. चालकाच्या समयसूचकतेचे कौतुक केले जात आहे. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.
Source link
सावंगी परिसरात बसचे ब्रेक फेल; 50 प्रवासी बचावले:चालकाची प्रसंगावधानता, भुसावळकडून येत होती बस