![]()
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवरा शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 30 मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मुरलीधर जाधव (50) असे मयत कर्मचाऱ्याचे नांव असून बंदोबस्त आटोपून ते बासंबा कडे निघाले असतांना हा अपघात झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालु्क्यातील बासंबा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी मुरलीधर जाधव हे त्यांच्या दुचाकीवाहनावर औंढा नागनाथ येथे बंदोबस्तासाठी गेले होते. त्या ठिकाणी बंदोबस्त आटोपून ते रात्रीच्या सुमारास परत बासंबा पोलिस ठाण्याकडे येत होते. यावेळी औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर हिवरा शिवारात त्यांच्या दुचाकीची ट्रकला धडक झाली. या अपघातात जाधव यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख, जमादार रवीकांत हरकाळ यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकि रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत मुरलीधर जाधव मुळचे भिरडा (ता. हिंगोली) येथील रहिवासी असून ते पुर्वी सैन्यदलात होते. श्रीनगर, पंजाब, कश्मीर या भागात त्यांनी कर्तव्य बजावले. सुमारे 14 वर्षापूर्वी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात भरती झाले. अत्यंत शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. मयत जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
Source link
हिंगोली-औंढा मार्गावर भीषण अपघात:बंदोबस्तावरून परतणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू; पोलिस दलावर शोककळा