![]()
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी गोवंशाच्या कत्तलीवर बंदी असून, जिल्ह्यात कत्तलखाना नसल्याने अवैध कत्तलीचे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापालिका क्षेत्रात अनेक जनावरे विना टॅगिंगची आहेत. अशा गुरांना टॅगिंग करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी. तसेच, ज्या जनावरांचे टॅगिंग झालेले नाही, त्यांना गोरक्षण संस्थांमध्ये पाठवावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बकरी ईदच्या काळात कत्तलीचे प्रकार रोखण्यासाठी जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करावी. न्यायालयात प्रकरण सुरू असताना जप्त केलेले वाहन सोडण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात अर्ज सादर करावा. पोलिस आणि परिवहन विभागाने प्रभावी कारवाई केल्यास अवैध वाहतूक करणाऱ्यांना धाक बसेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय, गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. गोवंश वाहतुकीसाठी नियम असून, त्याचे उल्लंघन झाल्यास प्राण्यांवरील क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला जाईल. गोवंशाची कत्तल रोखण्यासोबतच त्यांचे लसीकरण आणि आहार योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
Source link
बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट